एसटी धावते निम्मी रिकामीच

 ST Bus runs half empty in Sangali
ST Bus runs half empty in Sangali

सांगली : राज्य परिवहन विभागाच्या सांगली विभागातील प्रत्येक एसटी-बस निम्मी रिकामीच धावते असे चित्र दिसून आले आहे. सांगली विभागाचे सरासरी भारमान 50 टक्के इतकेच आहे. एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच आहे.

त्यामुळे परिवहन विभागाने "प्रवासी वाढवा अभियान' योजनेचे नाव बदलून आता "भारमान वाढ' अभियान एक मार्च ते 30 एप्रिलअखेर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आगारास दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकास दीड लाख आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. आगारांबरोबर विभागांना देखील बक्षीस दिले जाणार आहे. 

"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन धावणाऱ्या एसटी पुढे अनेक आव्हाने गेली कित्येक वर्षे कायम आहेत. तरीही आव्हानांचा सामना करत आणि तोटा सहन करत एसटी जोमाने धावत आहे. डोंगरदऱ्यातील वस्तीपासून ते दुर्गम भागापर्यंत एसटी पोहोचली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एसटीने गेल्या कित्येक वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एसटी ही खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. एसटी असल्यामुळेच ग्रामीण भागातील अनेकांना शिक्षण घेऊन करिअर करता आले अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांत अनुभवायला आली. आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी एसटी धावते. 

एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून म्हणाव्या तशा सवलती मिळत नाहीत. त्याबाबत विविध संघटना शासनस्तरावर सतत आंदोलन करतात. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतुकीचा एसटी ला सतत फटका बसतो. अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलिस आणि आरटीओ विभागाकडून म्हणावी तशी कारवाई होत नाही. त्यामुळे एसटीचे प्रवासी पळवण्याचे प्रकार राजरोस घडतात. टप्पा वाहतुकीचा अधिकार एसटी ला असताना इतर प्रवासी वाहने त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे एसटीला तोट्यात धावावे लागते. 

एसटीच्या आसन क्षमतेएवढे प्रवासी भरून फेऱ्या होतात की नाही? यावरून त्याचे भारमान काढले जाते. सध्या सांगली विभागातील दहा आगारांतील सरासरी भारमान 50 टक्के इतके आहे. याचाच अर्थ प्रत्येक एसटी निम्मे प्रवासी भरूनच धावते असा होतो. त्यामुळे एसटीचा तोटा आणखीनच वाढत आहे. इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नाही. 

प्रवासी वाढवा अभियान तीन-चार वर्षांपूर्वी राबवले जात होते. त्यामध्ये आता बदल करून "भारमान वाढवा' अभियान सुरू केले आहे. एक मार्च ते 30 एप्रिलअखेर अभियान राबवले जाईल. संपूर्ण राज्यात हे अभियान सुरू होणार आहे. जिल्ह्यात गतवर्षी मार्च 2019 चे भारमान 50 टक्के तर एप्रिल 2019 चे भारमान 54 टक्के होते. त्यामध्ये यंदा दोन टक्केने वाढ करण्याचे "टार्गेट' दिले आहे. त्याचबरोबर किलोमीटरमध्ये दोन टक्के वाढ करण्याचे आव्हान दिले आहे. 
 

गर्दी असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढवणार

विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारमान वाढवा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक आगारात चालक-वाहक यांचे प्रबोधन केले जात आहे. दिसेल तो प्रवासी बसमध्ये घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रवाशांची गर्दी असलेल्या मार्गावर एसटी च्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. 
- डी. बी. कदम, विभागीय वाहतूक अधिकारी

850 गाड्या दररोज धावतात
जिल्ह्यातील दहा आगारांतून दररोज 850 गाड्या विविध मार्गांवर धावतात. दररोज 2 लाख 80 हजार किलोमीटर अंतर कापले जाते. दररोजचे उत्पन्न 60 लाख रुपये इतके आहे. सद्य:स्थितीत हे उत्पन्न एक कोटी रुपये इतके मिळणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com