राहुरी : मुळा नदीपात्रातील चार बंधारे भरण्यासाठी आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता मुळा धरणाच्या अकरा पैकी दहा दरवाजे उघडण्यात आले. दोन हजार क्युसेकने धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. दुपारी एक वाजता विसर्ग वाढवून, अडीच हजार क्युसेक करण्यात आला.
मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजुळपोई येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मागणीवरून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुळा धरणातून खास बाब म्हणून ५५० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले.
मुळा पाटबंधारेच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता सायली पाटील, धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांच्या उपस्थितीत धरणातून नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले. तीन ते चार दिवस नदी पात्रात पाण्याचा विसर्ग चालू राहील. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचार बंदी आदेश लागू आहे. नागरिकांनी नदीकाठावर पाणी पाहण्यास जाऊ नये. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये. अन्यथा, कायदेशीर कारवाई केली जाईल. असे सहाय्यक कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.
मुळा धरणातून नदीपात्रातील बंधाऱ्यांसाठी राखीव पाणीसाठा नाही. सन २००४ साली तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी राज्यातील धरणांच्या खालील नदीपात्रासाठी दहा टक्के पाणी धरणांमध्ये राखीव ठेवावे. असा मुद्दा विधानसभेत मांडला होता. नंतर, या प्रश्नावर पाठपुरावा झाला नाही. मुळा धरणातून नदीपात्राद्वारे मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. तेंव्हा, शेवटच्या दोन-तीन दिवसांत नदीपात्रातील चार बंधारे भरले जातात. परंतु, यंदा मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज नाही. त्यामुळे, नदीपात्रातील चारही बंधारे ऐन उन्हाळ्यात कोरडेठाक पडणार होते.
मंत्री तनपुरे यांनी राजकीय ताकद वापरून, खास बाब म्हणून धरणातून नदीपात्रातील बंधाऱ्यांसाठी पाणी मंजूर करुन घेतले. त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत मुळा नदीकाठचा पाणी प्रश्न मिटला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.