"या' मंत्र्यांच्या वडिलांचा सल्ला, बिबट्या खच्ची केला तरच.. 

These 'ministers' father's advice to the government
These 'ministers' father's advice to the government

राहुरी : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरीतील निवासस्थानासमोर शुक्रवारी (ता. 14) पहाटे बिबट्याने फेरफटका मारला. बिबट्या थेट मंत्र्यांच्या गल्लीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत राज्यमंत्री प्राजक्त यांचे वडील माजी खासदार प्रसाद यांनी "सकाळ'शी संवाद साधला. त्यांनी बिबट्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगळीच तरकीब सूचवली आहे. 

पिंजरा हा तात्पुरता उपाय 
मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. पाळीव जनावरे भक्ष्यस्थानी पडत आहेत. नरभक्षक बिबट्यांचे मानवावर हल्ले वाढले आहेत. पिंजरे लावणे तात्पुरता उपाय आहे. जंगलक्षेत्र वाढविणे. बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवणे. त्यासाठी बिबट्यांचे लसीकरण करणे. काळाची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, असा सल्ला माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी झाली सुरूवात 
तनपुरे म्हणाले, "बिबट्यांचे मानवावर हल्ल्याचे प्रकार वाढण्यास पंचवीस वर्षापूर्वी सुरुवात झाली. त्यात, बिबट्यांची चूक नाही. अनिर्बंध जंगलतोडीच्या मानवाच्या चुकीमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने कमी झाली. बिबटे नागरी वस्त्यांकडे वळले. ऊसाच्या शेतात बिबट्यांना गारवा, पिण्याचे पाणी मिळते. भूक लागल्यावर शेताच्या जवळपास शेळ्या, कुत्रे, वासरे अशी पाळीव जनावरे उपलब्ध असतात. त्यामुळे, ऊसाचे पीक बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित स्थळे झाली आहेत. 

सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना 
"शेतकऱ्यांच्या वस्त्यांवर पाळीव जनावरे ठार करून, बिबट्याने फडशा पाडल्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. परंतु, लहान मुलांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. फत्याबाद (ता. श्रीरामपूर) येथे पाच सप्टेंबर 2019 रोजी दर्शन देठे (वय - नऊ) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गळनिंब (ता. श्रीरामपूर) येथे 31 जानेवारी 2020 रोजी ज्ञानेश्वरी मरकड (वय-तीन) बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. पिंपळगाव फुणगी (ता. राहुरी) येथे तीन फेब्रुवारी 2020 रोजी श्रेया जाधव (वय - तीन) बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली. आज (रविवारी) पहाटे देवळाली प्रवरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गर्भवती शेळी ठार झाली. 

पुण्यातही बिबट्या आलाय 
मुळा व प्रवरा नदी काठावरील गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतकऱ्यांना दिवसा शेतात भीती वाटू लागली आहे. पुणे येथे कर्वे रोडवर बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे ग्रामीण भाग असो वा शहर. बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्यांना पिंजरे लावून पकडले. वनक्षेत्रात सोडले. तरी, ते चोवीस तासांत चाळीस किलोमीटर फिरतात. त्यामुळे, पिंजरे लावणे तात्पुरता उपाय ठरतो. मादी बिबट्या एकाच वेळी दोन ते तीन बछड्यांना जन्म देते. शासनाकडे बिबट्यांच्या संख्येची निश्‍चित आकडेवारी नाही. परंतु, बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे निश्‍चित आहे. 

बबनराव पाचपुते यांनी गांभीर्याने घेतलं नाही 
कुत्र्यांप्रमाणे बिबट्यांचेही निर्बिजीकरण करून, संख्या नियंत्रणात ठेवता येईल. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांना तसे सांगितले होते. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. आता, बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शासनाने बिबट्यांचे लसीकरण करण्याविषयी गांभीर्याने विचार करावा, असेही तनपुरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com