महापूराने कोल्हापूर विभागात शेतीचे पावणेतीन हजार कोटीचे नुकसान 

महापूराने कोल्हापूर विभागात शेतीचे पावणेतीन हजार कोटीचे नुकसान 

सांगली - महापुरामुळे कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतीचे सुमारे 2 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात सांगली जिल्ह्याचे सुमारे एक हजार कोटीचे नुकसान आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी सर्वोतपरी सरकार मदत करेल, अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,"" पुरग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे पुर्नगठन केले जाईल. महापूरातील शेतीच्या पंचनाम्यावर सबंधित शेतकऱ्यांची सही असणे बंधनकारक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. 19) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कृषी संचालक ( विस्तार) एन. टी. शिसोदे, जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र साबळे, उपस्थित होते.

कृषीमंत्र्यांनी आज सांगलीवाडी तसेच समडोळी गावातील पुरात बुडालेल्या पिकांची पाहणी केली. कृषी मंत्री बोंडे म्हणाले,"" महापूरामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 9 हजार 294 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अंदाजे दोन हजार 800 कोटीचे नुकसान झाले आहे.

या तिन्ही जिल्ह्यातील एक हजार 895 गावे बाधित झाली आहेत. शेतीचे पंचनामे सुरु केले आहेत. लवरच पंचनामे पूर्ण होतील. नदीकाठच्या भागातील शेतीची भीषण स्थिती आहे. पिकात पाणी गेल्याने पिके कुजली आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जो चारा उपलब्ध आहे, तो चारा वापरता येणार नाही. ऊसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भात, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, घेवडा, हळद, भाजीपाला, फुलपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.'

डॉ. बोंडे म्हणाले," महापूरात वाहून गेलेले किंवा खराब झालेल्या ठिबक सिंचनाचे युनिट, मोटार पंप याचे देखील पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मंगळवारी ( ता. 20) मंत्रीमंडळाची बैठक आहे, त्यामध्ये आर्थिक मदत वाढीबाबत निर्णय होवू शकतो.

ज्या पशुपालकांनी जनावरांचे टॅगिंक (नोंदणी) केली आहे, त्यांना मदत निश्‍चित होईल. नुकसानग्रस्त तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीकडून नुकसान भरपाईसाठीची कार्यवाही सुरु आहे. पुरग्रस्ता भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या भेटीचे आयोजन करण्यात येत असून आपत्कालीन पिक आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.' 

जिल्हानिहाय पिक नुकसान 

जिल्हा, नुकसान (हेक्‍टर) 
सातारा, 38 हजार 225 
सांगली, 66 हजार 069 
कोल्हापूर, 1 लाख 05 हजार 

सरकारची हेक्‍टरी मदत..( रुपयात) 
0 महापूर नुकसान- 13500 
0 शेतजमिन खरडून गेल्यास -38 हजार 
0 बहुपीक- 18200 
0 कोरडवाहू- 6800 
0 गाळ साचल्यास- 12200 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com