
इस्लामपूर : शनिवार व रविवार वगळता दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून व्यापारी योग्य ती काळजी घेतील असे म्हणत व्यवहार सुरू ठेवण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आज पालिकेत गर्दी केली. प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील, वाळवा तालुका संघर्ष समितीचे नेते शाकिर तांबोळी, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, उमेश कुरळपकर यांच्यासह व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले; मात्र श्री. माळी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रत व त्यावरील मुद्दा पुढे करत दुकाने बंदच राहतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना संपर्क साधला. नगराध्यक्ष पालिका कार्यालयात दाखल झाले. पालिकेच्या आवारात व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नगराध्यक्ष केबिनमध्ये काही प्रमुख व्यापाऱ्यांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यस्त होते.
जिल्हा पोलिस प्रमुखांशी संपर्क साधला, तर त्यांनी शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंदच राहतील, असे सांगितले. शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन असताना इतर दिवशी व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी होती, ती धुडकावून लावण्यात आली. नगरसेवक अमित ओसवाल, वैभव पवार उपस्थित होते. निशिकांत पाटील म्हणाले,""गतवर्षी आपल्याकडे सर्वात आधी कोरोना रुग्ण आढळले होते, त्यामुळे आपण अद्याप रेड झोनमध्ये आहोत. त्यामुळे हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
शासनाचे आदेश विचारात घेऊन सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी.'' सहायक पोलिस निरीक्षक अनिल साळुंखे म्हणाले,""हा कोरोना गांभीर्याने घ्या. इतर शहरांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. ती आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे.'' व्यापारी प्रतिनिधी मोहन पाटील व शाकिर तांबोळी यांनी दुकाने बंद राहिली तर व्यापाऱ्यांचे हाल होतील, त्यांना किमान दिलासा मिळेल अशा सवलती देणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली. जिल्हाधिकारी यांना भेटून म्हणणे मांडण्याचा निर्णय शहरातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
"आम्ही शासनाचा आदेश पाळू. नियम पाळू. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेऊ, परंतु 30 एप्रिलपर्यंत दुकाने पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. सर्वच व्यापारी चांगली आर्थिक स्थिती असणारे नाहीत, दुकाने बंद राहिल्यास त्यांचे हाल होतील. शासनाने त्यांना दिलासा द्यावा, ते सहकार्य करतील.'
- मोहन पाटील, शाकिर तांबोळी.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.