Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची ताकद जिरवाजिरवीतच वाया

Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची ताकद जिरवाजिरवीतच वाया

आमदारकीची निवडणूक लागली की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा काटा काढायचा आणि महापालिका निवडणुकीत आमदारांनी याच पदाधिकाऱ्यांचा तिकिटाच्या रूपाने पत्ता कट करायचा, शिवसेनेतील अशा जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पक्षाची मात्र हानी होऊ लागली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी विरोधी पक्षापेक्षा शिवसेनेतूनच अधिक हालचाली झाल्या. कपाळी भगवा नाम, हातामध्ये भगव्या रंगाचा दोरा, तोंडात ‘जय महाराष्ट्र’ आणि काम मात्र उलटे, अशी सवय अंगवळणी पडली आहे. विशेषतः निवडणूक लागल्यानंतर काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो. शिवसेनेचे काही पदाधिकारी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या बैठकांना हजेरी लावू लागले आहेत. पक्षाचा आमदार निवडून आणण्यापेक्षा तो पडेल कसा, याची व्यवस्था केली जात आहे.

एरव्ही शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख आणि शिवसेनेची भाषा करायची आणि नेमकी निवडणूक लागल्यानंतर काटा काढायचा प्रयत्न करायचा चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही शहर शिवसेनेचे राजकारण स्वत:भोवती फिरत ठेवले. आजी - माजी शिवसैनिक तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी विश्‍वासात घेतले नाही. 

सोबतची ठराविक मंडळी आणि आपण यापलीकडे त्यांनी व्यापक दृष्टिकोनातून शिवसेनेकडे पाहिले नाही. महापालिका निवडणुकीत पक्षापेक्षा त्यांच्यावर व्यक्तिगत प्रेम करणाऱ्यांना तिकिटे कशी मिळतील, यासाठी ते आग्रही राहिले. जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिकिटाची मागणी केलीच, तर त्याचा पत्ता कट केला जातो. दोन्ही गट परस्परांना इतके पाण्यात पाहतात, की ते निवडणूक लागण्याचीच वाट पाहत असतात.

१९८६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढील पंधरा वर्षांचा काळ शिवसेनेसाठी मंतरलेला होता. दिलीप देसाई यांच्या गळ्यात पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली. नंतर सुरेश साळोखे यांच्याबाबतही पक्षाचा करिष्मा कायम राहिला. राजेश क्षीरसागर यांनी दोन वेळा शहराचे नेतृत्व केले. त्या काळीही रामभाऊ चव्हाण विरुद्ध सुरेश साळोखे गट, तसेच अन्य गटात सेना विभागली गेली होती. पक्ष आहे म्हटल्यावर मतभेद, गट-तट असायचेच.

मात्र, व्यक्तिगत खुन्नस कुणी ठेवली नाही. यावेळी मात्र व्यक्तिगत द्वेषातूनच परस्परांचा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उमेदवार निवडून येण्यापेक्षा तो कसा येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. संपर्क प्रमुखांना हा वाद नवा नाही. त्यांनी वाद मिटविण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले नाहीत. या वादाचा शेवट कोणत्या टोकाला जाणार आहे, याचीच चिंता सामान्य शिवसैनिकांना लागून राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com