वांगी गावात मास्क-सॅनिटायझर गेले अडगळीत...कोरोना गांभीर्याचा उडाला फज्जा

corona logo.jpg
corona logo.jpg

वांगी (सांगली) - कडेगांवनंतर लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असलेल्या वांगीमध्ये "कोरोना" च्या गांभीर्याचा फज्जा उडाला आहे. सुरवातीला पोलिसांच्या धास्तीने वापरात असलेले मास्क व सँनीटायझर लोकांनी अडगळीत टाकले आहेत. गावात सर्वत्रच सोशल डिस्टन्सिंगची "ऐशी की तैसी" दिसून येत आहे. सुदैवाने परिसरांत कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने "आमच्याकडं कुठला रोग येतोय ?" या घमेंडीत वांगीकर वावरत आहेत.


"कोरोना" पुढे संपूर्ण जगाने हात टेकले असून यावर कोणतेही प्रभावी औषध निर्माण न झाल्याने "काळजी हाच प्रतिबंध" हे सूत्र अवलंबीले जात आहे. मात्र वांगी ( ता.कडेगांव) परिसरांतील लोक यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीसही कंटाळल्याचे दिसत आहे. पहिल्या लाँकडाऊन दरम्यान कोरोनासंदर्भात असणारे गांभीर्य लोकांमध्ये उरलेले नाही. प्रशासनाकडून प्रतिबंधीत असलेल्या गोष्टी वगळता वांगीतील सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरळीत सुरु झाले आहेत. तालुका प्रशासन, ग्रामपंचायत आणि दक्षता कमिटी यांचेकडून सातत्याने लोकांना सूचना करुनही लोक आपल्या मर्जीनूसार वागत आहे.

फक्त मुख्य पेठेत फिरताना तोंडाला मास्क लावण्याचे नाटक केले जात आहे. सँनीटायझर वापर पूर्णतः बंद झाला आहे. सर्व प्रकारच्या उद्योग, व्यापार व व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करुन "सोशल डिस्टन्सिंग" पायदळी तुडविले जात आहे. काहीजण घरात करमत नाही व वेळ जात नाही म्हणून गावात गप्पा झाडण्यासाठी येत आहेत. चौका-चौकात गप्पांचे फड रंगत आहेत. अशा चकाट्या पिटणा-यांची सकाळ- संध्याकाळ गावात नाहक गर्दी होत आहे.

सुमारे 13 हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाचे नागरीक 25 वाडी-वस्तीवर राहतात. बाहेरगावांहून सुमारे 600 नागरीक गावात परतले आहेत.यामध्ये मुंबईहून आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. दक्षता कमिटीच्या सहकार्याने आरोग्य विभागाने या सर्वांना "होम क्वारंटाईन" केले आहे. मात्र या सर्वांवर सतत देखरेख ठेवणे आवाक्याबाहेरचे आहे. सदर आजाराचे परिणाम गावातील कुणीही जवळून पाहिले नसल्याने गावातील कुणीही हा विषय गांभीर्याने घेत नाही. किंबहुना काळजी नाही घेतली तरी काही होत नाही. या अविर्भावात लोक आहेत. लोकांनाच स्वःताच्या मरणाची भिती नसेल तर किती प्रबोधन करणार ? यामुळे पोलिसांनीही दटावणे बंद केले आहे. वास्तविक कोरोनाची भयानकता तालुक्यातील खेराडे-वांगी, सोहोली आणि भिकवडी खुर्द हि गावे सोसत आहेत. वांगीकरांच्या सद्यस्थितीतील निष्काळजीपणामुळे अथवा दुर्दैवाने एखादा रुग्ण सापडला तर त्याची साखळी गावाच्या मानाने खूप मोठी असेल. लोकांनी स्वयंशिस्त बाळगून काळजी घेण्याचे आवाहन सुजाण नागरीक आणि दक्षता कमिटी करत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com