Sangli Lok Sabha 2024: ठाकरेंना झुगारुन सांगलीवर दावा ठोकणारे विशाल पाटील नेमके कोण आहेत?

Who is Vishal Patil : काँग्रेस आपला एकेकाळचा बालेकिल्ला राहिलेला काँग्रेसचा गड पुन्हा मिळवण्यासाठी धडपड करत आहे.
Vishal Patil
Vishal Patil

Who is Vishal Patil : 'सांगली लोकसभा मतदार संघात शिवसेनेने मार्ग काढावा, सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यामुळे माघार घेणार नाही ' असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी दिला. हा थेट इशारा होता उद्धव ठाकरे गटाला. कारण काँग्रेस आपला एकेकाळचा बालेकिल्ला राहिलेला काँग्रेसचा गड पुन्हा मिळवण्यासाठी धडपड करत आहे.

सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केलाय. याच जागेवरून सुरुवातीपासून चर्चा बैठका सुरु होत्या पण मार्ग काही निघत नव्हता. या जागेवरून महाविकास आघाडीतील वादही चव्हाट्यावर आला होता. पण सागंलीवरून चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसची नेतेमंडळी चांगलीच भडकलीत.

ठाकरेंच्या या निर्णयाचा बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण काँग्रेसला काहीही करून हा गमवलेला गड परत आणायचाय आणि त्यासाठी त्यांनी विशाल पाटलांना मैदानात उतरवलंय. त्यामुळे ठाकरेंना झुगारुन सांगलीवर दावा ठोकणारे विशाल पाटील नेमके कोण? हे जाणून घेऊया.

Vishal Patil
काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीला तयार, पण 'सांगली'च्या लढतीतून माघार घेणार नाही; विश्‍वजित कदम यांचा थेट इशारा

विशाल पाटील कोण?

विशाल पाटील म्हणजे सांगलीचे ४ वेळा खासदार राहिलेले प्रकाशबापू पाटील यांचे छोटे चिरंजीव आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठं नाव आणि राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू. विशाल पाटलांचे मोठे बंधू प्रतिक पाटील हे सुद्धा २ वेळा खासदार राहिलेत. त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालंय. सांगलीत वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी विशाल पाटील राजकारणात उतरलेत.

विशाल पाटलांनी सगळ्यात आधी २०१० साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवत राजकारणात एन्ट्री केली. पण या निवडणूकीत माजी मंत्री मदन पाटील जे विशाल पाटलांचे चुलत बंधू आहेत. त्यांच्या गटाचे प्रा.सिकंदर जमादार यांनी विशाल यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. पण पराभवानंतर जिथे एकीकडे बंधू प्रतिक पाटील यांनी काँग्रेस सोडली तिथे सांगलीत काँग्रेसला उभारी मिळवून देण्यासाठी विशाल पाटलांनी काम करायला सुरुवात केली.

Vishal Patil
कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हे ठरलेलंच नव्हतं, विशाल पाटीलच काँग्रेसचे उमेदवार असतील; सतेज पाटलांनी केलं स्पष्ट

२०१९ ची निवडणूक हरली

विशाल पाटलांनी जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकत्र करून स्वतःचा गट वाढवला आणि त्यातुनच 2015 मध्ये पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत मदन पाटलांचा पराभव करून २०१० चा बदला घेतला. त्यानंतर २०२१ मध्ये तर जिल्हा बँकेची निवडणूक एकतर्फी जिंकली.

विशाल पाटलांनी २०१९ ला सुद्धा लोकसभा लढवली होती. पण ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर. त्याच झालं असं की, २०१९ च्या निवडणूकीवेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली. त्यामुळे विशाल पाटलांनी राजू शेट्टी यांच्या पक्षात औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली.

विशाल पाटलांना यावेळी 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली होती. पण पराभव पत्कारावा लागला होता. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील असल्याचं बोललं गेलं. कारण होतं वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वैर. जे त्यांच्या पिढीसोबत कायम राहिलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जरी एकत्र निवडणूका लढवल्या तरी या निवडणूकीत जयंत पाटलांनी विशाल पाटील यांना कोंडीत पकडल्याचं बोललं जातं. त्यात संजयकाका पाटलांसोबत पडळकरांचं आव्हानही विशाल पाटलांना भारी पडलं.

वसंतदादाचा सांगलीत दरारा

पण आता पुन्हा एकदा विशाल पाटील लोकसभेसाठी मैदानात उतरलेत. वसंतदादा पाटील घराण्याचा दरारा पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी. कारण एकेकाळी दिल्लीला सुद्धा महाराष्ट्राची दखल घ्यावी लागली ती वसंतदादा पाटलांमुळे. काँग्रेस पक्षातचं नाही तर राज्याच्या राजकारणातही वसंतदादा पाटलांच्या घराण्याचं वर्चस्व होतं. असं बोललं जातं की वसंतदादांनी ज्या उमेदवाराकडे बोट दाखवलं त्याता जनता गुलाला लावायची.

वसंतदादाचा सांगलीत दरारा होता त्यामुळेच सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. वसंतदादानंतर त्यांचे चिरंजीव आणि विशाल पाटलांचे वडील देखील खासदार राहिले आणि प्रतिक पाटील सुद्धा २ वेळा लोकसभेवर गेले. पण मधल्या काळात वसंत पाटलांच्या वारसदारांना सहानुभुतीचा फायदा काही मिळाला नाही. पण २०१४ ज्या मोदी लाटेत प्रतिक पाटलांचा पराभव झाला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला. त्यानंतर प्रतिक पाटील जिल्ह्याच्या राजकारणातून बाहेर आलेच नाहीत. त्यांनी कांग्रेसची देखील साथ सोडली होती. त्यानंतर पु्न्हा २०१९ ला विशाल पाटलांचा पराभव झाला. त्यामुळे वसंतदादांच्या वारसदारांना चांगलाच संघर्ष करावा लागलाय.

Vishal Patil
येत्या २५ वर्षांत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांतील उच्च शिक्षणाचे मार्गक्रमण कसे असावे?

यामागचं कारण जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये पडलेली फुटही बोललं जातय. पण आता काँग्रेसमधील कदम, वसंतदादा आणि मदन पाटील गट एकत्र आले आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. त्यात वसंतदादांना मानणारा गट आजही सांगलीत मोठा आहे. अशात विशाल पाटलांच्या नावाला मोठा पाठिंबा पक्षातून मिळतोय आणि महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच मिळावी आणि विशाल पाटलांना संधी मिळावी यासाठी सगळेच झपाटून कामाला लागलेत. आता काँग्रेस नेते दिल्ली वाऱ्या देखील करतायेत याचा फायदा कितपत होतोय आणि ठाकरे या जागेतून माघार घेणार का? हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com