महामार्गावरील अपघातांमधील बळींचे उत्तरदायित्व कोणाचे ? 

महामार्गावरील अपघातांमधील बळींचे उत्तरदायित्व कोणाचे ? 

सातारा : महामार्गावरील खड्डयांमुळे वाहनांच्या टायरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच आता त्यातून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. तरीही प्रशासनाला महामार्गाच्या दुरवस्थेचे कोणतेच गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मानवनिर्मित मृत्यूच्या सापळ्यांमध्ये जाण्याऱ्या बळींचे उत्तरदायित्व कोणाचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

वाहन घेताना शासनाकडून "रोड टॅक्‍स' घेतला जातो. चारचाकी वाहनधारकांना त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. त्यानंतरही चांगल्या रस्त्यांवरून वाहन जाण्याच्या बदल्यात थोड्या-थोड्या अंतरावर "टोल'च्या स्वरूपात कर भरावा लागत आहे. परंतु, एवढे पैसे मोजूनही नागरिकांना योग्य सुविधा पुरवली जात नाही. सध्या तर, महामार्गावर पडलेले खड्डे हा गंभीर विषय बनत चालला आहे. गेल्या दीड महिन्यापासून महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डयांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. दररोज किमान आठ ते दहा वाहनांचे टायर फुटण्याचे, कापले जाण्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे खड्डयांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. नागरिकांमध्ये त्याबाबत तीव्र असंतोष निर्माण झालेला होता. तरीही प्रशासनाकडून त्याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आली नाही. त्याच्या परिणामी "डीमार्ट' समोर झालेल्या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर, काहींना अपंगत्व येण्याची शक्‍यता आहे. 

महामार्गावर पडलेले खड्डेच या अपघाताला प्रामुख्याने जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. महामार्गावरील खड्डयांमुळेच ट्रकचा टायर फुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या मध्येच उभा राहिला आणि त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु, या प्रकरणात गुन्हा दाखल होणार, तो ट्रॅव्हल्स चालकावर कारण तो भरधाव वेगात होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार. परंतु, ट्रक ज्या कारणामुळे रस्त्याच्या मध्ये थांबला त्या खड्डयांना जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्‍न आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांची ओरड सुरू असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर गुन्हा दाखल होणार का, रस्त्यावरील खड्डे भरण्याची जबाबदारी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का, असे प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहेत. जोपर्यंत तसे होत नाही, तोपर्यंत नागरिकांच्या जिवाशी असा खेळ सुरूच राहणार आहे. त्यामुळे केवळ ट्रॅव्हल्स चालकावरच नाही तर, या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवरही कारवाई करणे आवश्‍यक आहे. अन्यथा महामार्गावरील मृत्यूचा हा तांडव असाच सुरू राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com