संगमनेर : ""सदैव खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारचे पितळ उघडे पडले आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आहे. या महत्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. या काळ्या कायद्यामुळे देशात असंतोष निर्माण झाला. देशवासीयांनी या कायद्याचा विरोध, तसेच संविधानाचे रक्षण न केल्यास देशाचे पुन्हा एकदा विभाजन होईल,'' अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.
अवश्य वाचा- विखे वाद-विवाद स्पर्धेत पुण्याचा बोलबाला
सिन्हा यांनी काढलेल्या मुंबई ते दिल्ली गांधी शांती यात्रेचे शुक्रवारी (ता.10) संगमनेर येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते.
सिन्हा म्हणाले, ""या काळ्या कायद्याविरोधात समविचारी पक्ष व जनता रस्त्यावर आली. सुशिक्षीत विद्यार्थ्यांचे विचार दाबण्यासाठी केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर गुंडांच्या टोळ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात धुडगुस घातला.''
देशाची अर्थव्यवस्था रसातळाला
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशात 31 डिसेंबर 2014 पर्यंतच अत्याचार झाले का, जगातील इतर 54 देशांत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीत का, असा सवाल करून सिन्हा म्हणाले, ""देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. एक टक्का "जीडीपी' घसरल्यास देशाची 2 लाख कोटी रुपयांची हानी होते. संसदेने मंजूर केलेला हा कायदा संसदेतच बरखास्त करावा, नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करण्यासाठी ही शांती यात्रा काढली आहे.''
धर्म व राजकारणाची गफलत नको
चव्हाण म्हणाले, ""जातीयवादी विष पेरणाऱ्या पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. देशाचे सार्वभौमत्व व सर्वधर्म समभावाला मूठमाती देणाऱ्या या कायद्याचे खोटे फायदे सांगण्यासाठी भाजपचे अनेक प्रचारक सक्रीय झाले आहेत. मात्र, या कायद्याचे दूरगामी परिणाम सर्वांवर होणार आहेत. धर्म व राजकारणाची गफलत होता कामा नये. आज मुस्लिमांना, तर उद्या इतर धर्मियांनाही वगळण्यात येईल.
मोदी सरकारची हुकूमशाही मोडून काढा
''22 जानेवारीला या कायद्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्थिक स्थिती कोलमडली असूनही, गोंडस आकडे फुगवून सांगितले जात आहेत. मंदी, बेरोजगारी वाढली आहे. अर्थमंत्र्यांना बैठकीला न बोलाविता, पंतप्रधानांनी 13 बैठका घेतल्या. या सर्व परिस्थितीबाबत युवकांनी जागरुक होऊन मोदी सरकारची हुकूमशाही मोडून काढावी,'' असे आवाहन चव्हाण यांनी केले
हेही वाचा- कोरठण खंडोबा यात्रोत्सवास प्रारंभ
आमदार आशिष देशमुख, आमदार डॉ. सुधीर तांबे, विनायक देशमुख, दुर्गा तांबे, आबासाहेब थोरात, बाबा ओहोळ, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, ऍड. नीशा शिवूरकर, राजाभाऊ अवसक, सुनंदा जोर्वेकर आदी उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.