Sangli News : भरकटलेलं लेकरू बापाच्या मिठीत विसावलं; दुचाकीसाठी हट्ट करत सोडलं होतं घर

त्या’ला बुलेट हवी होती. वडिलांनी दुसरी बाईक दिली. तो रुसला अन् घर सोडून मुंबईला गेला. तेथे पैसे संपले, लोकांसमोर हात पसरायची वेळ आली.
youth left home for bullet bike family dispute sangli
youth left home for bullet bike family dispute sangliSakal

Sangli News : ‘त्या’ला बुलेट हवी होती. वडिलांनी दुसरी बाईक दिली. तो रुसला अन् घर सोडून मुंबईला गेला. तेथे पैसे संपले, लोकांसमोर हात पसरायची वेळ आली. दिसेल त्या गाडीत बसला. कोल्हापुरात आला. पुढं काय... भरकटला... अंकलीजवळ एकाला दिसला आणि त्याची सावली बेघर केंद्रात रवानगी झाली.

इथं थोडं सुरक्षित वाटल्यानंतर तो बोलू लागला. त्याची माहिती घरच्यांना दिली गेली. वडील, बहीण सांगलीत आले. त्याची चांगलीच फरफट झाली होती. आता बापाला पाहताच त्याचे डोळे पाणावले. भरकटलेलं ते लेकरू बापाच्या मिठीत विसावलं आणि ते कुटुंब आपल्या घरच्या दिशेनं रवाना झालं.

अमनलाल मिर्झा हा सावली बेघर निवारा केंद्रात पंधरा दिवसांपूर्वी दाखल झाला. त्याचे वय वर्षे २१. छत्तीसगडमधील बालोदा या छोट्याशा गावाचा रहिवासी. वडिलांचे किराणा दुकान आहे. व्यवसाय आणि शेतीवर त्यांचे कुटुंब चालते. अमनलाल याला चार मोठ्या बहिणी. अमनलाल हा कुटुंबातील लाडका.

त्याने वडिलांकडे बुलेटची मागणी केली. वडिलांनी ‘अजून लहान आहेस, नंतर घेऊ,’ असे सांगितले. हट्टाला पेटलेला अमनलाल ऐकत नव्हता. अखेर त्याच्या वडिलांनी एक दुचाकी घेऊन दिली. मात्र, त्याला बुलेटच हवी होती.

त्याने भांडण करून घर सोडले. पहिल्या दिवशी तो मुंबईत आला. तिकडे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांत फिर्याद दिली. तो मुंबईत रेल्वे स्टेशनवर अख्खा दिवस फिरत राहिला. पैसे संपल्यानंतर लोकांपुढे हात पसरले.

पंधरा दिवसांपूर्वी तो रेल्वेतून कोल्हापूरला आला. तेथून वाट मिळेल त्या दिशेने निघाला. त्याला रस्त्यावर लोकांनी अडवले. काही वस्तू काढून घेतल्या. अखेर जयसिंगपूरजवळ आल्यानंतर एका व्यक्तीने त्याला पाहिले. मळलेले कपडे, भुकेसाठी चाललेली धावाधाव पाहून त्याची विचारपूस केली. त्यानंतर ‘त्या’ व्यक्तीने सावली बेघर निवारा केंद्रास माहिती दिली.

केंद्राचे अध्यक्ष मुस्तफा आणि रफीक मुजावर यांनी त्याला केंद्रात आणले. त्या दोघांसह वंदना काळेल यांनी विचारपूस केली. मात्र अमन काहीच बोलला नाही. दोन दिवस शांत राहिला. केंद्रात सुरक्षित वाटल्यानंतर तो बोलू लागला.

कुटुंबीयांची आठवण येत होती. त्याने मुस्तफा आणि रफीक यांना हकीकत सांगितली. त्यांनी कुटुंबीयाशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी त्याचे वडील आणि बहीण सांगलीत आली. त्यांना अमनलाल दिसल्यानंतर रडू कोसळले.

मिठी मारली. मुस्तफाला धन्यवाद दिले. सारी प्रक्रिया पूर्ण करत अमनलाल पुन्हा छत्तीसगडला घरी रवाना झाला. काल रात्रीच तो घरी पोहोचला. सावली केंद्रातून सुरक्षित घरी पोहोचलेला अमनलाल ही २५० वी व्यक्ती आहे. आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, प्रकल्प अधिकारी ज्योती सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com