
पिंपरी - कितीही गंभीर गुन्हा करा, त्यामध्ये पोलिस अटक करतील अशी भीती वाटत असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. पोलिसांसमोर जाऊन थोडसं खोकलं अथवा शिंकलं तरी तुमची अटकेपासून सुटका होणार हे निश्चित. असाच अजब प्रकार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या सांगवी पोलिस ठाण्यात पहायला मिळाला. सोलापूरच्या उपमाहापौराबाबत घडलेल्या या अजब घटनेची पोलिस दलासह नागरिकांमध्येही जोरदार चर्चा आहे.
सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांनी एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात 4 मे 2019 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात काळे यांना ताब्यात घेण्यासाठी सांगवी पोलिसांना तब्बल एका वर्षाने ऐन कोरोनाच्या संकटात जाग आली. शुक्रवारी (ता.29) सकाळी सांगवी पोलिसांचे पथक तब्बल अडीचशे किलोमीटरवर असलेल्या सोलापूरमधील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले. काळे यांना ताब्यात घेऊन हे पथक रात्री मोठा गाजावाजा करीत शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिवारी (ता. 30) देखील सायंकाळी सातपर्यंत काळे यांना अटक केल्याचे सांगितले जात होते.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मात्र, शनिवारी सायंकाळनंतर अचानक काळे यांना अटक न करता केवळ ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगितले जाऊ लागले. पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत पोलिस दलासह नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे काळे यांना शिंका येऊ लागल्याने सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना उपचार करण्यासाठी केवळ समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिस अधिकारी सांगू लागले. दरम्यान, ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रूग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, असे असताना उपमहापौर काळे यांना सोडल्याने सांगवी पोलिसांची कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी उपायुक्त विनायक ढाकणे यांना दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे गुन्हेगारांना मात्र, चांगले दिवस आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पोलिसांची ही विशेष योजना केवळ काही विशेष गुन्हेगारांना अटकेपासून दूर ठेवण्यासाठी होती की इतरांसाठीही राहणार याबाबत गुन्हेगारांनाही उत्सुकता आहे.
या कारवाईबाबत उपस्थित झालेले काही मुद्दे...
* काळे यांना जर कोरोनासदृश्य लक्षण दिसत होती तर त्यांना समजपत्र दिल्यानंतर सोडून न देता पोलिसांनीच शासकीय रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही.
* गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटल्यानंतर ऐन कोरोनाच्या संकटातच पोलिसांना कशी जाग आली?
* सोलापूरला ताब्यात घेतले त्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी केली का?
* राजेश काळे यांना अटकेपासून वाचविण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे का?
चिंचवडमध्ये पादचाऱ्यांना उग्र वास आला...अन् मोटारीत बघितलं तर मृतदेह!
पोलिसांचा निष्काळजीपणा अनेकांच्या आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक
सध्या एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास तो परिसर तातडीने सील केला जातो. तेथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. एकीकडे पोलिस जीव धोक्यात घालून त्याठिकाणी ड्युटी करतात. तर दुसरीकडे राजेश काळे प्रकरणात काही पोलिस कोरोनासदृश्य लक्षण असतानाही त्या व्यक्तीला बिनधास्त सोडून देत असल्याचे दिसून येते. पोलिसांचा हा निष्काळजीपणा अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.