जॉब गमावलेले आयटीयन्स सध्या काय करतायत?

जॉब गमावलेले आयटीयन्स सध्या काय करतायत?

पिंपरी : कोरोनाचे संकट आल्यानंतर आयटी कंपन्यामधील कामाचा ओघ कमी होत गेला. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या आयटीयन्सवर नोकरी गमावण्याचे संकट आले. आतापर्यंत सुरू असणारे काम अचानकपणे बंद झाल्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्‍न समोर उभा असताना अनेक आयटीयन्सनी मानसिक संतुलन ढळू न देता, मन भक्‍कम करत पुन्हा उभे राहू आणि यशस्वी होऊच, असा निश्‍चय उराशी बाळगत स्वताचा व्यवसाय सुरु करण्याचा नवा मार्ग स्वीकारला आहे. लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यामुळे बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे आपण सुरू केलेला व्यवसाय वर्षभरात आकाराला येईल, असा विश्‍वास या आयटीयन्सना आहे.

पहिला प्रसंग...

हिंजवडीमधील एका आयटी कंपनीमध्ये सिनिअर असोसिएट पदावर काम करणाऱ्या अरुणकुमार या तरुणाची एप्रिल महिन्यात नोकरी गेली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धक्‍का बसलेल्या या तरुणाला आता काय करायचे, असा प्रश्‍न पडला होता. कोरोनामुळे नव्या नोकऱ्यांची संधीही उपलब्ध नाही. त्यामुळे दर महिन्याचा घराचा खर्च, बॅंकेचा हप्ता कसा भागवायचा याची चिंता त्याला सतावत होती. दरम्यान, आपण नवा व्यवसाय सुरु करु शकतो का, याची चाचपणी सुरु केली आणि त्याला संगणक दुरुस्ती, देखभाल आणि विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचली. हातात असणाऱ्या पैशाच्या आधार घेत त्याने घरातूनच या कामाची सुरुवात केली. कोरोनाचा संसर्ग असला तरी संगणक वापरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नसून दिवसेंदिवस ती वाढतच आहे. त्यामुळे या व्यवसायाला भविष्य चांगले आहे. सध्या महिन्याला 20 ते 25 हजार रुपये मिळत असले, तरी कालांतराने या रक्‍कमेत वाढ होईल, असा विश्‍वास असल्याचे अरुणकुमार याने सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरा प्रसंग...

बीपीओमध्ये काम करणाऱ्या पी. सचिन याला देखील कंपनीचे काम कमी झाल्यामुळे अचानक नोकरीवर पाणी सोडावे लागले. नोकरी करत असताना त्यांने बॅंकेकडून कर्ज काढून चारचाकी गाडी घेतली होती. त्यामुळे त्याने परमीट काढून ही गाडी टुरिस्टसाठी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बीपीओमध्ये महिन्याला 20 ते 22 हजार रुपये पगार मिळायचा. आता लॉकडाउन शिथिल होऊ लागला असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पगारातून जेवढी रक्‍कम मिळायची तितकेच पैसे त्यातून मिळणे शक्‍य होणार असल्याचे सचिन सांगतो. 

तिसरा प्रसंग...

एका आयटी कंपनीमध्ये डिझायनर म्हणून काम करणाऱ्या तुषारसिंग चांगल्या पदावर काम करत होता. महिन्याला त्याला पगारापोटी 70 हजार रुपये मिळायचे. मात्र, त्याच्यावर देखील नोकरी गमावण्याची वेळ आली. त्यानंतर त्यामधे फार काळ अडकून न बसता त्याने स्वताचा डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात नोकरीतील पगारा ऐवढे पैसे सुरुवातीला मिळणार नाहीत. आपल्यासाठी व्यवसायाचे क्षेत्र नवीन आहे. त्यामुळे सुरुवातीला कमी पैसे मिळाले, तरी चालतील पण काम दर्जेदार आणि चांगलेच या ध्येयाने या व्यवसायात उतरल्याचे त्यांने सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चौथा प्रसंग...

आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या अजिंक्‍यने नोकरी मिळवण्यासाठी पुण्याची वाट धरली. त्याला एका कंपनीत नोकरी देखील मिळाली. मार्च महिन्यात आलेल्या कोरोनामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. नवीन नोकरी कधी मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांने चंदननगरजवळील घराच्या परिसरात फळांच्या विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. सध्या त्यामधून घर खर्च चालू आहे. सध्याच्या परिस्थिती निवळल्यानंतर नवीन नोकरी मिळाली तर करायची अन्यथा हा व्यवसाय वाढवायचा असे ध्येय त्याने ठेवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com