Kirtan Mahotsav : वैश्विक समस्या सोडविण्याचे साधन वारी; जगन्नाथ महाराज पाटील यांचे प्रतिपादन

‘वैश्विक समस्या सोडविण्याचे साधन वारी आहे,’ असे प्रतिपादन मुंबई येथील कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांनी मंगळवारी (ता. २७) केले.
Jagannath Maharaj Patil
Jagannath Maharaj Patilsakal

पिंपरी - ‘वैश्विक समस्या सोडविण्याचे साधन वारी आहे,’ असे प्रतिपादन मुंबई येथील कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांनी मंगळवारी (ता. २७) केले. वारकरी हा सहिष्णू असतो. प्रसंगी मवाळ असतो. चुकीच्या गोष्टी घडतात, तेव्हा तो कठोरही होतो. ही शिकवण संतांनी दिली आहे. त्यानुसार वारकरी जगत असतो, असेही त्यांनी सांगितले.

आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. मंगळवारी (ता. २७) सोहळे पंढरपूरसमीप वाखरी मुक्कामी पोचले आहेत. मात्र, जे भाविक पंढरपूरला किंवा वारीला जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

त्यात दुसऱ्या दिवसाची कीर्तनसेवा जगन्नाथ महाराज पाटील यांनी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे पूजन त्यांच्या हस्ते झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या,

आवडे हें रूप गोजिरें सगुण।

पाहतां लोचन सुखावले ॥१॥

आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहें।

जों मी तुज पाहें पांडुरंगा॥ धृ॥

लांचावलें मन लागलिसे गोडी।

तें जीवें न सोडी ऐसें झालें॥३॥

तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी।

पुरवावी आळी मायबापा ॥४॥

... या अभंगाचे निरूपण त्यांनी केले.

जगन्नाथ महाराज पाटील म्हणाले, ‘सध्या प्रत्येकासमोर अनेक समस्या आहेत. आर्थिक आहेत. कौटुंबिक आहेत. त्यातून अनेकदा आत्महत्यासारख्या घटनाही घडत आहेत. समस्यांतून मुक्त होण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. महागडं जेवण घेतात. पण, त्यांच्या समस्या सुटत नाहीत.

Jagannath Maharaj Patil
Pimpri News : पावसाने ओढ दिल्यास शहरात आणखी पाणीकपात; महापालिकेचे नियोजन

पंढरपूरच्या वारीत मात्र अशा सोयीसुविधा मिळत नाहीत. तंबूत राहावे लागते. मिळेल ते खावे लागते. जागा असेल तिथे झोपावे लागतात. तरीही सर्व दु:ख, समस्या ते विसरून जातात. नामस्मरणात दंग होऊन नाचतात, गातात. आनंद घेतात. म्हणून वारी हे समस्या सोडविण्याचे वैश्विक साधन आहे.’

‘सकाळ’ने सत्याचा शोध घेतलाय

सांप्रत काल कलियुग आहे. त्यामुळे चांगलं काम करत राहावंसं वाटणं गरजेचे आहे. समाजात चांगलं करण्याची गरज आहे. चांगलं व्हावं, असं चांगल्यालाच वाटतं, त्यातूनच चांगलं होतं. हे चांगलं होण्याची गरज ‘सकाळ’ने ओळखली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये पंढरपूरच्या वारीचा अनुभव आपण आज घेत आहोत. हा विधायक, लोककल्याणाचा उपक्रम आहे.

Jagannath Maharaj Patil
Wakad News : वाकडकरांचे सलग तेराव्या वर्षी वारकऱ्यांसाठी महापंगतीचे आयोजन; १५००० वारकऱ्यांना अन्नप्रसाद

पत्रकाराने सत्य सांगावं, कथाकार वा कीर्तनकाराने कल्याणकारी सांगावं आणि कलाकाराने सुंदर मांडावं, त्यामुळे सत्यम् शीवम् सुंदरम् होईल. हाच वसा घेत ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. म्हणजेच त्यांनी सत्याचा शोध घेतला आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांनी व्यक्त केले.

पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे आज कीर्तन

‘सकाळ’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात बुधवारी (ता. २८) सायंकाळी साडेचारला आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तनसेवा होईल. गुरुवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता आळंदी येथील कीर्तनकार यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com