Ajit Pawar : झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न

पिंपरी आणि आकुर्डी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थींची सोडत पवार यांच्या हस्ते.
Ajit Pawar
Ajit PawarSakal

पिंपरी - राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टी विरहीत शहर असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचे घर मिळावे हे शासनाचे स्वप्न आहे. त्यासाठी १ हजार ५३८ प्रकल्पांच्या माध्यमातून १५ लाख सदनिकांच्या उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. गायरानावर स्वस्तात घरे उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत उभारलेल्या प्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, विठ्ठल काटे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘प्रत्येकाच घराचं स्वप्न पूर्ण व्हायला हव, आर्थिक दुर्बल घटकाच्या घरांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. राज्यात नऊ लाख सदनिकांना केंद्रीय मान्यता संनियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे. सहा लाखाहून अधिक कुटुंबांना सदनिकांसाठी अनुदान देण्यात आले आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी माध्यमातून घरे उपलब्ध होत आहेत. मोडकळीस आलेल्या घरांच्या जागी पक्की घरी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गरजू कुटुंबांना घर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणारा आहे.’

खासदार बारणे म्हणाले, ‘हक्काचे घर मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हे शक्य झाले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. महानगरपालिकेने आवास योजना राबविताना त्याचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्यावी.’

आयुक्त सिंह यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ९३८ सदनिकांची सोडत काढली जात आहे. सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर; अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी आभार मानले.

विनयकुमार चौबे यांना अजित पवार यांनी घेतले फैलावर

पिंपरी चिंचवड शहरात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी पत्रकारांची पोलीस अडवणूक करत आहेत, असे वारंवार घडले आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना समोरासमोर बोलवून सांगितले. त्यानंतर आज पुन्हा तोच प्रकार घडला. अजित पवार यांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांची प्रतिक्रीया घेण्यासाठी पुढे सरसावले.

परंतु, पोलिसांनी पत्रकारांना अडवले. त्यामुळे पवार यांच्याकडे पत्रकारांनी हा विषय मांडला. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांच्या समोरच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना बोलवून चांगलेच खडेबोल सुनावले. ‘पत्रकारांचा तो अधिकार आहे. त्यांना अडवू नये, संबंधित नेते बोलायचे की नाही ते ठरवतील’, असे म्हणत त्यांनी चौबे यांना फैलावर घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com