स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी कारभार; पॉस मशीन कायम बंद

Pos-Machine
Pos-Machine

पिंपरी - ‘गेल्या सहा वर्षांपासून मी रास्त धान्य दुकानातून धान्य घेतो. कुटुंबात जेवढे सदस्य आहेत, त्यानुसार धान्य मिळायला हवे; पण त्यानुसार गहू-तांदूळ अद्याप मिळालेले नाहीत. कित्येकदा सरकारकडून माल आला नसल्याचे सांगितले जाते. धान्याची पावती द्यायलाही दुकानदार टाळाटाळ करतो.

दुकानातील पॉस मशिन सतत बंद असते. ऑनलाइन किंवा हाताने लिहिलेली पावती गेल्या सहा वर्षांत मला दिलेली नाही...निगडी साईनाथनगरमधील एक शिधापत्रिकाधारक ‘सकाळ’ प्रतिनिधीला सांगत होते. ते शाहूनगर बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या रास्त धान्य दुकानात त्यांची नावनोंदणी आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिधापत्रिकेतील काळाबाजार थांबविण्यासाठी बायोमेट्रिकप्रणालीचा अवलंब करण्यात आला. मात्र, शिधापत्रिकांवरील आकड्यांमधील काळाबाजार अद्याप थांबलेला नाही. ही एकट्या शाहूनगरमधील परिस्थिती नसून, शहरात सर्व ठिकाणी असे प्रकार घडतात. सर्वच रास्त दुकानात गोरगरिबांना मिळत असलेल्या धान्याचा रास्त दुकानदार गैरफायदा घेत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीच्या पाहणीत उघडपणे दिसून आले. रास्त दुकानदार सरकारने घालून दिलेल्या नियमांनाही जुमानत नसल्याची परिस्थिती प्रकर्षाने समोर आली.

लाभार्थीला दर महिन्याला किती धान्य मिळाले? कुटुंबाप्रमाणे धान्याचे वाटप झाले की नाही? कुटुंबाने धान्याचा लाभ घेतला की नाही? एका कुटुंबाला किती किलो धान्य मिळाले? याची खबर चक्क ग्राहकांनाच नाही. शिधापत्रिकेवरही काही ठिकाणी नोंद केली जात आहे, तर काही ठिकाणी नोंदच केली जात नाही. ग्राहकाला तत्काळ धान्याचा मेसेज यायला हवा; पण तो देखील मोबाईलवर मिळत नाही. अनेकदा सर्व्हर डाउन असल्याचे कारण सांगून काहींना पावतीच्या मागील बाजूस पेनने लिहून दिले जात आहे. मात्र, रजिस्टरमध्ये हस्तलिखित पद्धतीने नोंद होत नाही. 

किचकट प्रक्रिया
सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीसाठी असलेल्या १८००२२४९५० या टोल फ्री क्रमांकावर ‘सकाळ’ प्रतिनिधीने संपर्क साधल्यास संबंधित महिलेने तक्रार नोंदवून घेतली नाही. http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करण्यास सांगितले. या सर्व किचकट प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जाऊन रास्त दुकानदारांचे फावले आहे.

ग्राहकांना पावती न दिल्यास तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. यासाठी ग्राहकांनी परिमंडळ कार्यालयात तक्रार करायला हवी. धान्य कुटुंबाप्रमाणे न मिळाल्यासही तत्काळ तक्रार देणे गरजेचे आहे. अन्यथा रास्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात येते. यासाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी नेमलेले आहेत. पावती न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
- दिनेश तावरे, अ व ज विभाग परिमंडळ अधिकारी, निगडी    

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com