रिक्षाचालकांची मुजोरी

रिक्षाचालकांची मुजोरी

संत तुकारामनगरमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी


शंभर मीटरच्या अंतरावर रुग्णाला घेऊन जाण्यासाठीही सर्रास ४० ते ५० रुपये भाडे

पिंपरी, ता. ३ ः संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) हॉस्पिटलच्या परिसरात रिक्षा चालकांकडून नागरिकांची मनमानी पद्धतीने भाडे आकारून लूट केली जात आहे. शंभर मीटरच्या अंतरावर रुग्णाला घेऊन जाण्यासाठीही सर्रास ४० ते ५० रुपये भाडे मागितले जात असून, एवढी रक्कम न देणाऱ्या नागरिकांचे भाडे घेण्यास सर्रास नकार देत आडमुठी भूमिका घेतली जात आहे. याप्रकारामुळे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले असून, मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
शहरात जवळपास १५ हजार रिक्षा रोज प्रवासी वाहतूक करतात. त्यातील बहुतांश रिक्षा विनापरवाना असून, त्यांच्यावर परिवहन आणि पोलिस विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. संत तुकारामनगर येथे महापालिकेचे सर्वात मोठे यशवंतराव चव्हाण रूग्णालय आहे. कमी दरामध्ये येथे आरोग्य सेवा मिळत असल्याने दररोज हजारो नागरिक येथे उपचारासाठी येत असतात. तर काही नागरिक उपचारांसाठी या रूग्णालयामध्ये दाखल होतात. रुग्णालयामधून घरी जाताना बाहेर उभे असलेले रिक्षाचालक मनाला वाटेल ते भाडे सांगतात. कमी भाड्यात रिक्षाचालकाने येण्याची तयारी दाखविली तर त्याला विरोध करून प्रसंगी अपशब्द वापरले जातात. वायसीएममध्ये ज्या तपासण्या होत नाहीत, त्या तपासण्या हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या तपासणी केंद्रातून करण्याचा सल्ला दिला जातो. तेथे जाण्यासाठी रिक्षा करावी लागते. हे अंतर शंभर मीटरपेक्षा कमी आहे. मात्र, यासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांकडून ४० रुपये भाडे आकारले जात असल्याची तक्रार नातेवाईकांकडून केली जात आहे.
रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या तपासणी केंद्रात जायचे आहे, असे रिक्षाचालकांना सांगितले तर पहिल्यांदा भाडेच नाकारले जाते. त्यानंतर ४० रुपये द्या नाही तर चालत जा’, अशी भाषा रिक्षाचालकांकडून वापरली जाते. तपासणी झाल्यानंतर पुन्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सोडण्यासाठी रिक्षाचालकांनी ४० रुपये भाडे घेतल्याची तक्रार सुजाता जाधव यांनी केली.


‘आरटीओ'', वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष
शहराच्या विविध उपनगरांमध्ये जाण्यासाठी पीएमपीची आवश्यक ती सोय नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने रिक्षानेच प्रवास करावा लागतो. त्यातील अनेक रिक्षांना आरटीओचा परवाना नाही, अनेक रिक्षांचा विमाही काढलेला नसतो. विनापरवाना चालणाऱ्या रिक्षांची कोणतीही तपासणी रिक्षाचालक मनमानी कारभार करत अव्वाच्या सव्वा भाडे घेत असतानाही आरटीओ किंवा वाहतूक पोलिस त्यांच्यावर काहीही कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com