वारी मार्गाच्या सक्षमीकरणावर मशालचा ‘प्रकाश’

वारी मार्गाच्या सक्षमीकरणावर मशालचा ‘प्रकाश’

पुणे, ता. ६ ः संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या सक्षमीकरणासंदर्भातील त्रिमितीय आराखडा मशाल या संस्थेने तयार केला असून, नुकतेच त्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये दिवसेंदिवस आषाढी वारीत वाढणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा आणि त्यानुरुप आवश्यक त्या सुविधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
मशाल या स्वयंसेवी संस्थेने देहू-पंढरपूर व आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाचा आराखडा तयार केला आहे. शिवाजीनगर येथील हॅंडमेड पेपर्स संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात देहूतील संत तुकाराम महाराज संस्थान आणि आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांना हा आराखडा विभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अधिकारी राजेश तितर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. या निमित्ताने ‘मशाल’ने केलेल्या पालखी मार्गांच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांसंबधात ‘मशाल’ने आजपर्यत केलेले संशोधन तसेच यापुढे राबविण्यात येणाऱ्या योजना याचेही प्रदर्शन भरविण्यात आले होते. संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, चंद्रकांत महाराज गारगोटे, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभय महाराज टिळक, राजाभाऊ चोपदार तसेच राजेश तितर, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, मशाल संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक दीपक विश्ननाथन, अधिराज शितोळे, उज्जल भोईर, सोमी दास आदी उपस्थित होते. पार्थ पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
राजेश तितर म्हणाले, ‘‘शाश्वत पायाभूत सुविधा उभारताना वारीच्या एक-दोन दिवसांनंतर इतर वर्षभर त्याची देखभाल व वापर हा कळीचा मुद्दा आहे. त्यावर तोडगा काढणेही काळाची गरज आहे.’’ दीपक विश्वनाथन यांनी आभार मानले.

दिंड्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही महत्वाचा ः पार्थ पवार
वारीचे नियोजन अधिकाधिक काटेकोर व्हावे, जेणेकरुन वारकरी व ग्रामस्थांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी स्थानिक पातळीवरची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिंडीप्रमुखाला एक कार्ड देण्याचाही उपक्रम राबविणे गरेजेचे आहे, असे पार्थ पवार यांनी कळविले आहे.

‘मशाल’चा मानस
- पंढरपूर वारीदरम्यान सामान्य वारकऱ्यांसाठी स्थायी व अस्थायी स्वरुपातील पायाभूत सुविधांची निर्मिती करणे
- पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाण्याची शाश्वत सोय करणे
- पालखी मार्गांवरील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे
- दोन्ही पालखी सोहळा मार्गांवर तसेच पालखी तळावर वृक्षारोपण करणे
- मार्गावरील गावांतील दुर्लक्षित ऐतिहासिक स्थळांचा जीर्णोद्वार करणे तसेच पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे
- दोन्ही पालखी सोहळ्यांत सहभागी असलेल्या दिंड्यांची निर्देशिका तयार करणे

‘‘वारी म्हणजे एका संपूर्ण शहराने केलेली यात्रा होय. याचे नियोजन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, ती संपूर्ण संप्रदायाची तसेच मार्गांवरील गावांतील ग्रामस्थांचीही आहे. मशाल संस्थेने हाती घेतलेल्या या कामात आवश्यक ती मदत करण्यास आळंदी संस्थान कायम तयार आहे.’’
- डॉ. अभय टिळक, विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान

‘‘वारीच्या बदलत्या रुपाला अनुसरुन प्रशासनातही त्यानुरुप बदल केले पाहिजेत. नियोजनाची नेमकी दिशा ठरविण्यासाठी वारकरी, ग्रामस्थ, दोन्ही देवस्थानचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी आणि मशाल सारख्या स्वयंसेवी संस्थांचे परिसंवाद आयोजित करणे गरजेचे आहे. ‘मशाल’च्या कामास सर्व प्रकारचे साह्य करण्यास देहू संस्थान कटिबद्ध असेल.’’
- माणिक महाराज मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान

३३५११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com