वाकड चौकातील पूल पाडणार नाही

वाकड चौकातील पूल पाडणार नाही

वाकड, ता. १४ : हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्गात अडथळा ठरणारे पुणे शहरातील दोन पूल मागील लॉकडाउन काळात पाडण्यात आले. दरम्यान, मेट्रो वाकड चौकातून जाणार असल्याने ‘राजीव गांधी उड्डाणपूल’ देखील पाडला जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. परंतु, मेट्रोला कोणताही अडथळा येत नसल्याने पूल जैसे थे राहणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आयटी पार्क हिंजवडीत जाण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९९९ मध्ये पूल उभारण्याचा निर्णय घेतला. ३२८ मीटर लांब आणि १०.७० मीटर रुंदीच्या या पुलाला पावणे सात कोटी खर्च आला होता. २००४ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, आयटी पार्कचा दिवसेंदिवस विस्तार होत गेला आणि वाहनांची वर्दळ वाढून वाहतूक कोंडी होण्यास सुरू झाली. यावर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या. मात्र, कायमस्वरूपी मार्ग निघालेला नाही. आयटी क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू असताना म्हणजे लॉकडाउनपूर्वी सकाळ आणि सायंकाळी कंपन्यांच्या कार्यालयीन वेळेत हिंजवडीत येणाऱ्या कामगारांची संख्या तीन लाखांवर होती. त्यामुळे दोन्ही वेळेस पुलामुळे हिंजवडीतील चारही बाजूंची वाहतूक ठप्प होत असे.

या पार्श्वभूमीवर पुलाची रचना चुकली आहे, महामार्गावर समतल पद्धतीने पूल उभारण्याऐवजी तो आडवा बांधायला हवा होता, तो पाडून टाकावा अशी नागरिकांची मते आहेत. दरम्यान, मेट्रोला अडथळा अडथळा ठरणारे पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर चौकातील दोन पूल मागील लॉकडाउन काळात पाडण्यात आले. ही मेट्रो आयटी पार्क हिंजवडीचे प्रवेशद्वार असलेल्या वाकड चौकातून जाणार असल्याने हा वाकड पूलदेखील पाडला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत ‘सकाळ’ने ‘पीएमआरडीए’चे महानगर नियोजनकार विवेक खरवडकर यांच्याशी संवाद साधला. यावर ते म्हणाले, ‘‘या पुलाला गृहीत धरूनच आम्ही मेट्रो मार्गाचा आराखडा आखला असून त्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे त्यामुळे हा पूल पाडण्याचा अथवा तो मेट्रोला अडथळा ठरण्याचे काही कारण नाही.’’

पूल पाडला जाणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे वाहतूक कोंडी समस्या तशीच राहणार आहे. गेल्या वर्षी पुलाच्या दोन्ही बाजूंना भुयारी मार्ग केल्याने येथील समस्या काही प्रमाणात सुटली आहे. मात्र, दोन भुयारी मार्ग व दोन सेवा रस्ते यामुळे येथे मुंबई व कोल्हापूरवरून येणाऱ्या वाहनचालकांना नेमके वळायचे कुठून आणि थांबायचे कुठे? हे समजत नाही. सध्या हिंजवडीतील शिवाजी चौकापर्यंत एमआयडीसी व वाकडपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करत आहे. त्यातच येथील अनेक कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे, तर काही कंपन्या कमी क्षमतेवर सुरू आहेत त्यामुळे आयटी पार्क पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वी येथील सर्व मुख्य रस्ते, पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करून वाहतूक समस्या कायमची सोडविण्याची अपेक्षा आयटी कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com