
वीजपुरवठा सुरळीत करण्याची भोसरी परिसरातून मागणी
भोसरी, ता. ११ ः येथील काही भागातील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भोसरी पीएमटी चौक, गावठाण, सम्राट अशोकनगरसह काही भागातील विद्युत पुरवठा सकाळी बंद होतो. विशेषतः या भागातील महापालिकेच्या पाणी सोडण्याच्या दिवशीच बऱ्याच वेळ विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी भरता येत नाही. महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही. त्याचप्रमाणे नियमित तक्रार करणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक कनिष्ठ अभियंत्यांकडून ब्लॉक करण्यात आल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. महावितरणशी संपर्क साधण्यासाठी दिलेला क्रमांक महावितरने दिला आहे. मात्र, हा क्रमांक बऱ्याच वेळा व्यस्त असतो. महावितरणशी संपर्क होईपर्यंत पाण्याची वेळ संपलेली असते. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
भोसरी गावठाण, पीएमटी चौक, सम्राट अशोक नगर आदी भागांसह इतरही भागातील विद्युत पुरवठा मार्च महिन्यात ४, ६, ७, ८ या तारखांना सलग खंडित झाला होता. बुधवारी (ता. ८) विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य केबल वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता.