गटाराच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

गटाराच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

भोसरी, ता. १५ ः येथील गवळीनगरमधील जलनिस्सारण वाहिन्या वारंवार तुंबत असून सुमारे पन्नास कुटुंबांच्या घरांसमोरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. त्यामुळे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांना घरात बसणेही कठीण झाले आहे. पिण्याच्या पाण्यालाही दुर्गंधी येऊ लागल्याने तातडीने ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
भोसरीतील गवळीनगरमध्ये गेल्या एक महिन्यांपासून गटार तुंबण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिकेच्या जलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तेथील गटाराची तात्पुरती दुरूस्ती केली जाते. मात्र, दोन-चार दिवसांनी पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी अर्जुन जैसवार, नितीन गवळी, जितेंद्र गवळी आदींसह येथील नागरिकांनी केली आहे.

गवळीनगरमध्ये गटार तुंबण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे तात्पुरती देखभाल-दुरूस्ती करण्यात येते. त्यामुळे, समस्येत आणखी भर पडली आहे. ही समस्या महापालिकेने कायमस्वरूपी सोडविणे गरजेचे आहे.
- हर्षदा गवळी, स्थानिक रहिवासी

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मी आजारी पडलो होतो. जितेंद्र गवळी यांच्या घरातीलही दोन व्यक्ती आजारी आहेत. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिका गटाराची समस्या न सोडविता रहिवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे.
- परशुराम पाटील, स्थानिक रहिवासी

भोसरीतील गवळीनगरमधील जलनिस्सारण वाहिनीमधूनच पावसाचे पाणी जाते. रहिवाशांच्या घरगुती सांडपाणी वाहिन्यांमधून टाकाऊ अन्नपदार्थ त्यामध्ये येत असल्याने घुशींचे प्रमाण वाढले आहे. या घुशी जलनिस्सारण वाहिन्यांमध्ये माती भरत असल्याने गटारी तुंबत आहेत. त्याचप्रमाणे गटाराच्या चेंबर लाईन दुरूस्ती करण्यासाठी पुरेशी जागाही रहिवाशांनी न सोडल्याने गटाराच्या दुरूस्तीसाठी अडचणी येत आहेत.
- प्रियांका म्हस्के, कनिष्ठ अभियंता, जलनिस्सारण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

पिण्याच्या पाण्यालाही दुर्गंधी
गवळीनगरमध्ये काही पाण्याच्या वाहिन्या गटारामधून गेल्या आहेत. नादुरुस्त पिण्याच्या वाहिन्यांमधून गटाराचे पाणी येत असल्याने काही भागांतील पिण्याच्या पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी रहिवासी करत आहेत.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हवालदिल
गटार तुंबल्यानंतर महापालिकेच्या कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वारंवार संपर्क साधल्यावर महापालिकेद्वारे फक्त तात्पुरती दुरूस्ती करण्यात येते. दोन-चार दिवसांनी ही समस्या पुन्हा उद्भवत असल्याने येथील रहिवासी पूर्णपणे त्रस्त झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com