हिंजवडीत कोंडीचे सत्र कायम
प्रशासनाने कारवाई करूनही ‘आयटी’ कर्मचाऱ्यांना त्रास

हिंजवडीत कोंडीचे सत्र कायम प्रशासनाने कारवाई करूनही ‘आयटी’ कर्मचाऱ्यांना त्रास

Published on

पिंपरी, ता. २३ : अवघ्या काही दिवसांच्या पावसामुळे हिंजवडीमधील रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथील प्रशासकीय विभागांवर समाज माध्यमांवर सडकून टीका झाली. यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने येथील रस्ते बुजवणे, रस्त्यांवर आलेला चिखल काढणे, मेट्रोच्या कामाचा राडाराडा हटवणे, बुजवलेले नाले शोधणे, नाले बुजवणाऱ्यांना नोटीस बजावणे अशी विविध कामे हाती घेतली. त्यासाठी वारंवार बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, हे सर्व करूनही हिंजवडीतील वाहतूक कोंडी अद्यापही कमी झालेली नाही. सोमवारी ही हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली

दहा वर्षात पहिल्यांदा नालेसफाई
कोरोनानंतर बहुतांश मोठ्या कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ बंद केले. काही कंपन्यांनी हायब्रीड पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे आठवड्यातील पाच दिवस येथे कोंडी होते. मे महिन्याच्या शेवटी सुरू झालेल्या पावसामुळे हिंजवडीत अवघ्या काही मिनिटात पाणी भरले. सलग तीन वेळा हीच परिस्थिती उद्भवल्यानंतर येथील प्रशासनाने पावले टाकायला सुरवात केली. मात्र, दहा दिवस उलटल्यानंतरही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच प्रशासनाने नालेसफाई केल्याचे येथे येणारे आयटी कर्मचारी सांगतात. मात्र, या कामासोबतच येथील वाहतूक नियमन, रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्तेही विकसित केले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आहे.


अन्कलॉग हिंजवडी मोहीम
हिंजवडीमध्ये आयटी पार्क येऊन वीस वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला. मात्र येथील रस्ते आयटी पार्कच्या दर्जाचे झालेले नाहीत. एकाच भागात विविध प्रशासकीय संस्थांचा हस्तक्षेप असल्याने रस्त्याच्या कामांबाबत अद्यापही टोलवाटोलवी होत आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क व येथील भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावा; यासाठी हिंजवडीतील आयटीयन्सनी अनक्लॉक हिंजवडी ही सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत एका दिवसात दहा हजारांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून, आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे हिंजवडीतील रस्ते चांगले व्हावेत, हे जनमत असल्याचे या मोहिमेचे कार्यकर्ते सचिन लोंढे यांनी सांगितले आहे.

‘‘प्रशासकीय संस्थांच्या समन्वयाचा अभाव हे हिंजवडीतील सध्याच्या परिस्थितीचे मुख्य कारण आहे. त्यामुळे हिंजवडी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट करावे. जेणेकरून येथे रस्ते व पायाभूत सुविधा देणे सोपे जाईल. ही मोहीम पूर्ण झाल्यावर आम्ही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत.

सचिन लोंढे, अनक्लॉग हिंजवडी मोहीम

‘‘मी वाकडला राहतो. मला रोज फेज ३ ला प्रवास करावा लागतो. मात्र, गेल्या ४ वर्षांत येथील रस्त्याची सुधारणा झालेली नाही. उलट मेट्रोच्या कामामुळे अधिकच खराब झाले आहे. या कामाचा राडारोडा अजूनही रस्त्यावर पडलेला आहे. त्यामुळे रस्ते झाल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.

: वैभव, आयटी कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com