अपुरी यंत्रसामग्री, तज्ज्ञांची वानवा मुळावर
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : ‘आयआरबी’ तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडील अपुरी यंत्रसामग्री, तज्ज्ञांची उणीव आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उलटलेला टँकर २८ तासानंतरही काढण्यात प्रशासन अपयशी ठरले होते.
हा टँकर (एनएल ०१ एजी ४२५०) केरळमधील कोचीवरून गुजरातमधील भरूच, दहेज येथे जात होता. टँकर उलटल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, खालापूर पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रोपेलिन गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने खबरदारी म्हणून वाहतूक बंद करण्यात आली. पण, टँकरमध्ये गॅस असल्याने तो बाजूला काढण्याचा धोका आयआरबी आणि महामार्ग पोलिसांनी पत्करला नाही. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला पाचारण करण्यात आले. हे पथक मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले, मात्र वायुगळती रोखण्यासाठी त्यांच्याकडेही पुरेशी यंत्रसामग्री नव्हती. त्यामुळे त्यांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. एका स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. शेवटी अपघाताच्या अकरा तासानंतर पहाटे चार वाजता भारत पेट्रोलियमच्या मुंबईतील तज्ज्ञांच्या पथकाला कळविण्यात आले. पाच जणांचे पथक पहाटे साडे सहाच्या वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यानंतर भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ व्यवस्थापक सतीश अलोन यांच्या देखरेखीखाली वायुगळती बंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
असे झाले प्रयत्न
बोगद्याजवळ उतार असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टँकर बाजूच्या लोखंडी गर्डरला धडकून उलटला. टँकरमध्ये २० टन प्रोपेलिन वायू होता. टँकर डाव्या बाजूला उलटल्यामुळे तीन पैकी एक व्हॉल्व तुटला. इतर दोन व्हॉल्व लिकेज् झाले. त्यामुळे वायुगळती सुरू झाली. भारत पेट्रोलियमच्या पथकातील तज्ज्ञांनी बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लीक अरेस्टिंग (रबर कीट) कीटने गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, व्हॉल्वमध्ये पुरेशी जागा नसल्यामुळे त्यांना कीट लावता आले नाही. त्यानंतर व्हॉल्वच्या आकाराचा लाकडी साचा बनविण्यात आला. सकाळी आठच्या सुमारास तुटलेल्या व्हॉल्वमधून होणारी गळती बंद झाली, पण इतर दोन व्हॉल्वमधून गळती सुरूच होती. सकाळी नऊच्या सुमारास दोन व्हॉल्ववर पट्टी आणि रसायनांचे आवरण लावून ते बंद करण्यात आले. त्यानंतर टँकरमधून वायू काढण्यासाठी भारत पेट्रोलियमच्या पथकासमोर दोन पर्याय होते. एक म्हणजे वायू रिकव्हरी व्हॅनमध्ये गॅस घेणे आणि दुसरा मोकळ्या टँकरमध्ये गॅस पाइपच्या माध्यमातून हलविणे. त्यामुळे पथकाने रिकव्हरी व्हॅन मागविली, पण दुपारपर्यंत रिकव्हरी व्हॅन उपलब्ध होऊ शकली नाही. अखेरीस रिकामा टँकर आणून त्यात पाइपच्या माध्यमातून वायू सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अपघाताच्या तब्बल २३ तासांनी म्हणजेच सायंकाळी साडेचारच्या सुमारास यास सुरवात झाली. अपघातग्रस्त टँकरमधून तीन टन वायू टँकरमध्ये काढण्यात आला. त्यानंतर तो टँकर अर्धवट उभा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा दुसरा टँकर बोलावून त्यामध्ये उर्वरित वायू काढण्यास सुरवात झाली. ही प्रक्रिया रात्री साडेनऊ पर्यंत सुरू होती.
---
फोटो
92860
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

