‘आयसीयू’तील रुग्णांच्या स्थलांतराचा ‘इलाज’ गंभीर

‘आयसीयू’तील रुग्णांच्या स्थलांतराचा ‘इलाज’ गंभीर

Published on

पिंपळे गुरव, ता. २८ ः वातानुकूलित (एसी) यंत्रणा अचानक बंद पडल्याने नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) १२ रुग्णांना तातडीने केमोथेरपी वॉर्डात स्थलांतरीत केल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र संसर्गाचा धोका असताना निर्जंतुकीकरण न करता त्यांना त्या वॉर्डात ठेवणे कितपत सुरक्षित आहे ?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
साधारणतः सहा महिन्यांपूर्वी देखील मुख्य ‘आयसीयू’ची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती. त्यावेळी तीन ते चार दिवसांपासून रुग्णांना विनावातानुकुलीत अवस्थेत उपचार घ्यावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘आयसीयू’ विभागात तापमान नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. व्हेंटिलेटरवरील आणि अतिगंभीर रुग्णांसाठी नियंत्रित तापमान आवश्यक असते. मात्र, आता दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. यावरुन ‘एसी’ यंत्रणेच्या वारंवार होणाऱ्या बिघाडाकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून गंभीर रुग्णांचे वारंवार स्थलांतर त्यांच्या प्रकृतीस घातक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोविड काळात वापर
विशेष म्हणजे, केमोथेरपीचा वॉर्ड हा करोना काळात कोविड विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) म्हणून राखीव ठेवण्यात आला होता. त्यानंतर सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी या वॉर्डात कर्करोग रुग्णांच्या केमोथेरपी उपचारांना सुरुवात करण्यात आली होती. या वॉर्डात तूर्तास कोणत्याही कर्करोग रुग्णावर उपचार चालू नव्हते. परंतु, मुख्य आयसीयूतील एसी यंत्रणा बंद पडताच प्रशासनाने कोणतीही सखोल निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण न करता रुग्णांना थेट केमोथेरपी वॉर्डात हलविल्याचे समजते.

नागरिकांचे म्हणणे
- एखाद्या वेळेस ‘एसी’त तांत्रिक बिघाड होऊ शकतो; मात्र तोच प्रकार वारंवार घडणे गंभीर
- कायमस्वरूपी तोडगा न निघणे हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे द्योतक
- संसर्ग नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन झाले का याची सखोल चौकशी व्हावी
- या संपूर्ण प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी


मुख्य आयसीयू विभागातील वातानुकूलित (एसी) यंत्रणेची दुरुस्ती पूर्ण झाली असून ती सुरळीतपणे कार्यरत करण्यात आली आहे. मुख्य आयसीयू विभागाचे रविवारी संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्या दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्यात आलेले रुग्ण पुन्हा मुख्य आयसीयू विभागात हलविण्यात येतील.
- डॉ.किरण खलाटे, विभाग प्रमुख, अतिदक्षता विभाग


गेल्या दहा दिवसांपासून नवी सांगवीतील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील वाताकुलीन यंत्रणा बंद होती. ओरड झाल्याने केमोथेरपी विभागात त्यातील रुग्णांना हलविण्यात आले. परंतु, केमोथेरपी वॉर्डाचे निर्जंतुकीकरण न करताच स्थलांतराचा घाट रुग्णाच्या जिवावर बेतू शकतो.
- शरत शेट्टी, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते
PMG26B03162

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com