विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना द्यायला हवी

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना द्यायला हवी

Published on

पिंपरी, ता.९ ः ‘‘राज्याला कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. जेणेकरून तरुणांना स्थानिक उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना दिली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर बनेल’’, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.

किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या मुख्य सभागृहात तिसरा दीक्षांत सोहळा गुरुवारी (ता.९) झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोश्यारी बोलत होते. यावेळी कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार अध्यक्षस्थानी होते. समारंभास फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर, लेफ्टनंट (निवृत्त) प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, ‘‘तरूणांनो, सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. सरकारी अनुदानातून स्‍टार्टअप सुरू करा. सरकारच्या २०२० शिक्षण धोरणाप्रमाणे देशाच्या मिशन आणि व्हीजनप्रमाणे कौशल्य मिळवा. नवीन प्रेरणेनुसार ‘सरकारी बाबू’ बनण्यापेक्षा आत्मनिर्भर बना. राज्याला कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. ज्यामुळे तरुणांना स्थानिक उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत होईल आणि त्याच वेळी कुशल मनुष्यबळाची उद्योगाची मागणी पूर्ण होईल. भारतातील प्राचीन कौशल्यांचा अभ्यास करा. कारण आता त्याच कौशल्यांची गरज भासणार आहे. कोणत्याही कामाचा दर्जा कमी मानू नका. ज्या क्षेत्रात शिकत आहात, त्या क्षेत्रात अव्वल व्हा.’’

खत्री म्हणाले, ‘‘देशातील तरुणांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्याचा ‘सिंबायोसिस’चा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांनी निराशेला बाजूला सारून जीवनाचा खरा आनंद कामात शोधला पाहिजे. कामाची पूजा करा. कामाचे ओझे डोक्यावर घेऊ नका. आव्हाने पेलण्यास शिका.’’

कुलपती मुजुमदार म्हणाले, ‘‘सध्या कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. अशा स्थितीत केवळ असे शिक्षण देणारी विद्यापीठे तरतील. नोकरी करण्‍यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आणि यातूनच उद्योगधंद्यांना देखील कुशल मनुष्यबळ मिळेल. आपल्या देशातील तरुणांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्याचा आमच्या विद्यापीठाची महत्त्वपूर्ण वाटा आहे.’’

विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देत डॉ. मुजुमदार म्हणाल्या, ‘‘कौशल्य विद्यापीठ हा शैक्षणिक क्षेत्रातील नवा प्रयोग आहे. आम्ही ७० टक्के प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देत आहोत.’’
--
सोहळ्यात ७२२ विद्यार्थ्यांचा सन्मान
दीक्षांत सोहळ्यात ७२२ विद्यार्थ्यांना (४११ पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी, ३० पदविका आणि २८१ प्रमाणपत्रे) सन्‍मानित करण्यात आले. तुराई अंजनेय कृष्णा (बी.एस्सी. डेटा सायन्स) आणि सोहन अरुण पाटील (एम. टेक मेकॅट्रॉनिक्स) यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यासाठीचे ‘कुलपती सुवर्णपदक’ प्रदान केले. अब्राहम फर्नांडिस (बी.टेक. मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी) याला ‘आत्मनिर्भर पुरस्कार’ आणि स्वप्नील मखरे आणि स्वाती पांचाळ यांनी ‘कुशल पुरस्कार’ प्राप्त केला.


२३६५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.