नदीत राडारोडा टाकल्यास फौजदारी
महापालिका आयुक्तांची माहिती; सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यार्थ्यांची मदत घेणार

नदीत राडारोडा टाकल्यास फौजदारी महापालिका आयुक्तांची माहिती; सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यार्थ्यांची मदत घेणार

पिंपरी, ता. १३ ः नद्यांच्या संवर्धनासाठी नदी सुरक्षा दलाची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. नदी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून, नद्यांमध्ये राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला. नदी संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांचीही मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ‘नदी संवर्धन’ विषयासंदर्भात आयोजित बैठकीत सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बंसल, अनिल राऊत, उपअभियंता योगेश अल्हाट, सिटिझन फोरमचे तुषार शिंदे, इन्होवेशन ॲन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनचे संजय लकडे, जलदिंडीचे राजीव भावसार, सूर्यकांत मुथियान आदींसह विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नदी संवर्धनासाठीच्या आपल्या तक्रारी व सूचना आयुक्तांसमोर मांडल्या.

अशी होईल कार्यवाही
नदीपात्रात कचरा टाकताना कोणी आढळल्यास, त्या व्यक्तीचे किंवा त्या परिसराचे छायाचित्र काढून स्मार्ट सारथी ॲपमधील ‘पोस्ट अ वेस्ट’ या सुविधेच्या आधारे विद्यार्थी महापालिकेशी संपर्क साधू शकतात. माहिती मिळताच महापालिकेतर्फे संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. नदीकाठी पडलेला राडारोडा किंवा कचरा उचलण्यात येईल. पथनाट्य, पदयात्रांद्वारे नदीकाठच्या नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. विद्यार्थी व शिक्षक नदी संवर्धनासाठी महापालिकेस आणि सामाजिक संस्थांना सहकार्य करू शकतात.

आगामी काळातील स्थिती
- शहरात अनेक ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प असून, नवीन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे.
- महापालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उगमापासून संगमापर्यंत पाहणी करण्यात येत आहे
- नदी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये सामाजिक संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मदतीने जनजागृती केली जाईल

नदी संवर्धनासाठी महापालिकेने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ड्रेनेज किंवा नाल्यांमधून नदीमध्ये दूषित किंवा मैलामिश्रित पाणी जाऊ नये, यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नाल्यांद्वारे नदीमध्ये कचरा, प्लॅस्टिक, दूषित पाणी जाऊ नये, यासाठी नाल्यांवर मॅकेनिकल स्क्रीन्स लावल्या आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com