Pavana Dam
Pavana Damsakal

Pavana Dam : पवना धरणात २८ टक्के पाणीसाठा

पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोमवारपर्यंत अर्थात ११ जुलैपर्यंत ५५ मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे.

पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोमवारपर्यंत अर्थात ११ जुलैपर्यंत ५५ मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठाही वाढला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३.५८ दशलक्ष घनमीटरने अधिक आहे. सोमवारी उपयुक्त पाणीसाठा २७.९५ टक्के होता. तो शंभर टक्के होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.

धरणातील जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा विचार केला जातो. त्यानुसार उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत विसर्गाचे प्रमाण ठरविले जाते. धरणापासून नदी पात्रातून आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते.

दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. तेथून पाणी जलवाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होता. सध्या २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. समान प्रमाणात सर्वांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन भागात विभाजन केले आहे.

त्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण शहराला ५१० एमएलडी पाणीपुरवठा करण्याऐवजी निम्मे शहरालाच तेवढे पाणी दिले जात आहे. त्यामुळे शिवाय, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज ५० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे.

पाणीकपातीची होती भीती

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पहिल्या आठवड्यात अपेक्षित असणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. तेव्हापासून मावळातही दररोज पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पावसाने आणखी ओढ दिली असती तर, एक जुलैपासून आणखी पाणी कपातीचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र, पाऊस सतत सुरू असल्याने हळूहळू धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले असून, शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

आंद्रात ४३.२३ टक्के साठा

आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणीकोटा शहरासाठी मंजूर आहे. त्याअंतर्गत चिखली येथे ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र महापालिकेने उभारले आहे. सद्यःस्थितीत भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनी, जॅकवेल आदी कामे सुरू आहेत.

आंद्रा धरणातून विसर्ग केलेले पाणी इंद्रायणी नदीतून शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी निघोजे येथील बंधाऱ्यातून दररोज ५० एमएलडी पाणी घेतले जात आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पातून पुरवठा सुरू आहे. सोमवारपर्यंत आंद्रा धरणात ४३.२३ टक्के पाणीसाठा होता.

‘पवना धरणात सध्या एकूण पाणीसाठा १०१.६७ दशलक्ष घनमीटर आहे. एक जूनपासून आतापर्यंत ६२७ मिलिमीटर पावसाची नोंद धरण क्षेत्रात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा जास्त पाणीसाठा आहे.’

- समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण

पवना धरण पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये ११ जुलैची स्थिती)

वर्णन/एकूण पाणीसाठा/जिवंत पाणीसाठा

२०२३ /१०१.६७ /७०.५३

२०२२ / ९८.०९ / ६६.९५

फरक / ००३.९८ / ०३.९८

पवना धरण क्षेत्रातील पाऊस (मिलिमीटरमध्ये ११ जुलैची स्थिती)

एक जूनपासूनचा पाऊस - ६२७ मिलिमीटर

गेल्या वर्षीचा पाऊस - ५७२ मिलिमीटर

यावर्षी तुलनेने अधिक पाऊस - ५५ मिलिमीटर

एकूण पाणीवाढ - २८.६५ दशलक्ष घनमीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com