क्षमता ओळखून समाजकार्याची भावना बाळगा
‘विद्यार्थ्यांशी संवाद’ कार्यक्रमात महापालिका आयुक्तांचे आवाहन

क्षमता ओळखून समाजकार्याची भावना बाळगा ‘विद्यार्थ्यांशी संवाद’ कार्यक्रमात महापालिका आयुक्तांचे आवाहन

Published on

पिंपरी, ता. ११ ः ‘विद्यार्थी समाजासाठी कशा प्रकारे योगदान देऊ शकतो?’, ‘बांधकामांसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना आपण पर्यावरणाचा समतोल कसा साधू शकतो?’, ‘गरिबीबाबत आपले मत काय?’, ‘प्रशासकीय सेवेसाठी तुम्ही जम्मू काश्मीर, मणिपूर असे राज्य का निवडले नाही?’, ‘हिंसेचे प्रमाण का वाढत आहे, ते कसे कमी करण्यात येईल?’ हे प्रश्न आहेत, शाळेतील विद्यार्थ्यांचे. त्यांची उत्तरे दिली महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून समाजकार्याची भावना बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आजचे विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे नागरिक आहेत. त्यांच्या मनातील विविध विचार, प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त सिंह यांनी निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी मंगळवारी (ता. ११) संवाद साधला. उपायुक्त रवीकिरण घोडके, प्राचार्य मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, पर्यवेक्षिका कल्याणी पटवर्धन आदी उपस्थित होते. उषा मोरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना आयुक्तांनी उत्तरे दिली. सिंह म्हणाले, ‘‘सिग्नलवर थांबल्यानंतर वाहन बंद करणे, घरात कोणी नसल्यास दिवे बंद करणे, अशा छोट्या-छोट्या कृतींमधून पर्यावरणाविषयी जागृती करता येते. ज्या क्षेत्रात रस आहे, त्यात झोकून देऊन काम केले पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रात मनापासून काम करून देशासाठी संपूर्ण योगदान आपण देऊ शकतो.

आयुक्त सिंह म्हणाले...
- नव्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत तयार करण्यासाठी जमिनीची उत्पादकता वाढवायला हवी, पर्यावरणपूरक विकास करणे गरजेचे आहे
- कौशल्यविकास व रोजगार निर्मितीच्या शिक्षण देऊन एखाद्याला दारिद्र्यातून बाहेर काढणे शक्य आहे. शिवाय, गरिबी निर्मूलनासाठी सरकारी विविध योजना आहेत.
- जीवनात आवड आणि ध्येयाची योग्य सांगड घालणे आवश्यक असते, त्यामुळे मी महाराष्ट्र केडर निवडले, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम केलंय
- कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला घडवणे, प्रत्येकांत माणुसकीची भावना जागृत करायला हवी.
- असुरक्षित पद्धतीने खाद्यपदार्थ बनवणारा व विकणाऱ्यांसह अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे
- स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले असून, जून २०२४ पर्यंत स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प पूर्ण होतील.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.