महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता जीवंत - राज ठाकरे
राज्यात जे सुरू आहे, त्याचा राग कसा येत नाही
राज ठाकरे यांचा पत्रकारांना सवाल, चुकीच्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचे आवाहन
पिंपरी, ता. १९ : पंतप्रधानांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर सहा दिवसात अजित पवार सत्तेत गेले. पक्षाशी अशी प्रतारणा केल्यावर पूर्वीचे संपादक संपादकीय लेखातून त्यांची चूक दाखवून द्यायचे. मात्र, सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे, याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आकुर्डी-प्राधिकरण येथे शनिवारी (ता. १९) पत्रकारांनाच विचारला.
पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्यावतीने पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषद झाली. समाजातील विविध घटना निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांचा ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘निर्भीड पत्रकारिता ही टिकली पाहिजे. समाजामध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टी या चव्हाट्यावर आल्या पाहिजेत. राज ठाकरे चुकीचे काही करत असेल तर तेही बाहेर आले पाहिजे.’’
ते म्हणाले, ‘‘एकदा बातमी प्रसिद्ध झाली की झाली. त्यावर सोशल मिडीयावर काय प्रतिक्रिया येतात, त्याकडे लक्ष देऊ नका. मोबाईलमुळे अनेक निरुद्योगी माणसे व्यक्त व्हायला लागली आहेत. मागचा-पुढचा इतिहास, विषय, पत्रकारिता याची काहीच माहिती नसणाऱ्या लोकांना राजकीय लोकांनी टीका करण्यासाठी पाळले आहे, त्यांना प्रतिक्रिया कशाला देता? जे महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या हिताचे आहे, ते लिहिण्याची व बोलण्याची सध्या गरज आहे.’’
पत्रकारितेशी प्रामाणिक असलेले पत्रकार महाराष्ट्रात आहेत. मात्र, वाया गेलेले पत्रकारही महाराष्ट्रात असून काही प्रमुख हुद्द्यांवर आहेत. अनेक पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. पत्रकारितेतील असे लोक सुधारता कसे येतील, याचा विचार व्हायला हवा. आमचे डोळे उघडणे, प्रबोधन करणे, चिमटे काढणे, पत्रकारांचे काम आहे. पण विनाकारण खोट्या बातम्या पसरविणाऱ्या लोकांना अटकाव करणे, हेही तुमचे काम आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयंत जाधव यांनी प्रास्ताविक केले. अनिल कातळे यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद वाकडे यांनी आभार मानले.
सन्मानित पत्रकार
कमलेश सुतार (संपादक, लोकशाही), अनिल मस्के (संपादक, दै. पुण्यनगरी, वऱ्हाड), अमित मोडक (डिजिटल माध्यम), संदीप महाजन, अविनाश खंदारे (दै. लोकमत, यवतमाळ), अश्विनी सातव डोके (सहयोगी संपादक, न्यूज स्टेट महाराष्ट्र ), नितीन पाटील (संपादक - पोलिसनामा), आशिष देशमुख (दै. पुढारी, पुणे), महेश तिवारी (न्यूज १८ लोकमत, गडचिरोली)
फोटोः 62256
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.