वाहतुकीचा प्रश्‍न रावेतमध्ये दिवसेंदिवस गंभीर

वाहतुकीचा प्रश्‍न रावेतमध्ये दिवसेंदिवस गंभीर

Published on

पिंपरी, ता. १० ः बेशिस्त वाहनचालक, अधून-मधून बंद अवस्थेतील सिग्नल, पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे औंध-रावेत बीआरटी मार्गावरील पुनावळे गावाकडे जाणाऱ्या चौकात अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, अनेकदा चालू सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे असे प्रकार येथे घडतात. त्यामुळे, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
रावेत येथील संत तुकाराम महाराज पुलाच्या दोन्ही बाजूला सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी ही येथून प्रवास करणाऱ्यांची डोकेदुखी बनली आहे. रावेत, पुनावळे, ताथवडे या भागात राहणारे बहुतांश नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे, या रस्त्यांवर वाहनांची रहदारी अधिक असते. चारचाकी वाहने, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे वाहतूक संथ होते. त्यातूनही वेळ वाचविण्यासाठी अनेकदा वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
रावेतकडून शिंदेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकदा पोलिस वाहतुकीचे नियमन करतात. मात्र, तेथून अवघ्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या संत तुकाराम पुलाजवळील पुनावळे गावाकडे जाणाऱ्या चौकात सतत वाहतूक कोंडी होत असतानाही वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. दुर्घटना झाल्यानंतरच पोलिस प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्‍नही नागरिक विचारत आहेत.

औंध-रावेत बीआरटी रस्त्यावरील बास्केट पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौकांमध्ये सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र, काही बेशिस्त वाहन चालकांमुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसेल. पण, अनेकदा ही मागणी करूनही पोलिसांचा आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
- हितेश रहांगडाले, रहिवासी, रावेत

इतर उपनगरांच्या तुलनेत रावेत येथील रस्ते विकसित झालेले आहेत. मात्र, त्या तुलनेने येथे होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मात्र सुटलेला नाही. वाढती वाहनांची संख्या पाहता वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासोबतच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणेही आवश्‍यक आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही तसे होताना दिसत नाही.
- प्राजक्ता रुद्रवार, सदस्या, रावेत-किवळे फेडरेशन

रावेतमधील बहुतांश भागातील वाहतुकीचे नियमन हे निगडी वाहतूक विभागातडून केले जाते तसेच बास्केट पुला अलीकडचा भाग वाकड वाहतूक विभागाच्या हद्दीत येतो..पण रावेतला वेगळा असा वाहतूक विभाग नसल्याने वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे.


बास्केट ब्रीजच्या अलीकडील भाग हा वाकड वाहतूक विभागा अंतर्गत येतो. वाकड, पुनावळे, ताथवडे भागांत जास्त कोंडी होते. तुलनेने पुनावळेकडे जाणाऱ्या चौकामध्ये तुलनेने वाहतूक कोंडी कमी होते. त्यामुळे, या चौकात गरजेनुसार वॉर्डन नेमले जातात.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग

PIM24B18195

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.