चिखली, मोशी, चऱ्होलीत
पाणी वितरण कोलमडले

आंद्रा धरणाचे ‘इंद्रायणी’तून मिळेना पुरेसे पाणी

चिखली, मोशी, चऱ्होलीत पाणी वितरण कोलमडले आंद्रा धरणाचे ‘इंद्रायणी’तून मिळेना पुरेसे पाणी

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी ः आंद्रा धरणातून प्रतिदिन शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा शहरासाठी मंजूर आहे. सद्यःस्थितीत इंद्रायणी नदीवरील निघोजे जवळील बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जात आहे. मात्र, त्यातूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडुळगाव, भोसरीसह उत्तर व पूर्वेकडील समाविष्ट गावांच्या वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडले आहे. त्यांची तहान भागवण्यासाठी पवना नदी आणि ‘एमआयडीसी’च्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
नियमित, समान व पुरेसे पाणी शहरातील नागरिकांना मिळावे, यासाठी महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी प्रशासनाने शहराचे दोन भागात विभाजन केले आहे. ‘एका भागात आज व दुसऱ्या भागात उद्या’ असे पाणीपुरवठा नियोजन केले आहे. त्यासाठी पवना धरणातून मिळणारे, औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) घेतलेले सुमारे ५४० एमएलडी पाणी एकाच दिवशी सर्व शहराला देण्याऐवजी अर्ध्या शहराला आज व अर्ध्या शहराला उद्या पुरवले जात आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी नागरिकांना मिळत असून, त्याबाबतच्या तक्रारी कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, दोन दिवस पुरेल इतका पाणीसाठा नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान, आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील प्रतिदिन २६७ एमएलडी पाणी कोटा शहरासाठी मंजूर आहे. त्यातील आंद्रा धरणातील शंभर एमएलडी पाणी गेल्या डिसेंबरपासून सुरू झाले आहे. त्यासाठी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा केला जात आहे. तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात वाहिन्यांद्वारे पाणी आणले जात आहे. तिथे प्रक्रिया केल्यानंतर चिखली, मोशी, डुडुळगाव, दिघी, बोपखेल, भोसरी, इंद्रायणीनगर, प्राधिकरण सेक्टर एक ते २० पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. भामा-आसखेड प्रकल्पाचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदीतून त्याचा उपसा करून वितरण केले जात आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून नदी व निघोजे बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसून, संबंधित गावातील पाणी वितरणावर परिणाम झाला आहे.

असे मिळते पाणी (एमएलडीमध्ये)
पवना धरण ः ५२०
आंद्रा धरण ः १००
एमआयडीसी ः ३०
एकूण ः ६५०

दृष्टिक्षेपात...
- ‘एमआयडीसी’कडून सध्या प्रतिदिन २७ किंवा २८ एमएलडी पाणी मिळत आहे
- निघोजे बंधाऱ्यातून प्रतिदिन शंभर ऐवजी २० ते २१ एमएलडी पाणी मिळत आहे
- दोन पंप चालू राहण्यासाठी निघोजे बंधाऱ्यात किमान दोन मीटर उंचीपर्यंत पाणी पातळी हवी, शिवाय पाणी प्रवाह अखंडित असावा लागतो
- पवना धरणात सध्या ५२ टक्के पाणी साठा असून, ३० जुलैपर्यंत पुरेल अशी स्थिती आहे
- आंद्रा धरणाचे नियमित व पुरेशा पातळीत निघोजे बंधाऱ्यातून पाणी मिळाल्यास वितरण सुरळीत होईल
- उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, त्याप्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती

‘‘गेल्या दोन दिवसांपासून इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून पुरेसे पाणी मिळत नाही. जलसंपदा विभागाचे अधिकारी म्हणतात, की कोट्यानुसार पाणी नदीत सोडले जात आहे. पण, दोन पंप चालतील इतका पाणीसाठा बंधाऱ्यात होत नाही. नदीतील पाणी पातळीही खालावली आहे. या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, भोसरी, इंद्रायणीनगर भागात निगडी प्राधिकरण सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून आणि ‘एमआयडीसी’कडून पाणी घेऊन वितरित केले जात आहे. काही अंशी
कपात करावी लागत आहे.
- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, महापालिका
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com