फाउंडेशन कोर्सने प्रवेश परीक्षेत यश सोपे

फाउंडेशन कोर्सने प्रवेश परीक्षेत यश सोपे

पिंपरी, ता.१२ ः अनेक पालक इयत्ता अकरावीनंतर आयआयटी व वैद्यकीयसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीला लागतात. त्यापूर्वीच इयत्ता सहावीपासूनच मुलांची अभ्यासाची तयारी पालकांनी करून घेणे क्रमप्राप्त आहे. फाउंडेशन कोर्समुळे मुलांचा पाया पक्का झाल्यावर प्रवेश परीक्षा ‘क्रॅक’ करणे सोपे होऊ शकते, असा सल्ला ‘एक्‍सिड’चे संचालक प्रा. आशिष दुबे यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.
चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ विद्या’ व ‘एक्‍सिड’ने (एक्‍सलंट एज्युकेशन) पालकांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यासाठी विविध करिअर आणि प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी ‘सकाळ’च्या पिंपरी चिंचवड आवृत्तीचे उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ यांच्या हस्ते प्रा. आशिष दुबे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. दुबे म्हणाले, ‘‘सध्या स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच ‘आयआयटी’सारखी स्पर्धा परीक्षा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा आहे. परंतु योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळत नसल्याने मुलांचा गोंधळ उडतो.
अभियांत्रिकीसाठी राज्य पातळीवरील ‘सीईटी’ आणि देश पातळीवरील ‘जेईई’ व वैद्यकीयसाठी ‘नीट’ या परीक्षा आहेत. ‘नीट’ (NEET) असो ‘जेईई’ (JEE Mains), वा ‘सीईटी’ असो या परीक्षांविषयीच्या सर्वच शंकांचे निरसन वेळेवर होणे आवश्‍यक आहे. बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र व नियोजन यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. यानुसार, अभ्यासाचे तंत्र व योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. त्यासाठीच्या ‘नीट’, ‘जेईई’ यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांचा पाया कसा भक्कम करता येईल ? आणि अवघड वाटणाऱ्या या परीक्षांवर प्रभुत्व कसे मिळविता येईल ?, यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्‍यक असते. म्हणूनच विद्यार्थ्याला विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, तरच अवघड अभ्यास सोपा होतो. पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. याबरोबरच वैद्यकीय अभ्यासक्रमाची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, वैद्यकीय अभ्यासक्रमांतील संधी, देशासह परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रम करायचा असल्यास त्याबाबत मार्गदर्शन आणि माहिती दिली. सोप्या क्‍लृप्त्या वापरून वैद्यकीय शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास करावा. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा अभ्यास आत्मविश्‍वासाने करावा.’’

मूलभूत संकल्पनांसह सरावाने यश
प्रा.दुबे म्हणाले,‘‘इयत्ता आठवी - नववीपासूनच तयारीला लागलो; तरच बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कमी होतो. अकरावीला गेल्यावर संगत अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे, मित्र निवडताना जाणीवपूर्वक निवडा. अभ्यासाची बैठक टप्प्या-टप्प्याने वाढवा. पालकांनी पाल्यांना मोबाईल, व्हॉट्‌सऍप, फेसबुक आदींच्या बळी पडू देऊ नये. पालक आणि मुलांमधील संवाद कमी झालेला आहे. दहावीनंतरच्या सुट्टीचा उपयोग हा संवाद वाढविण्यासाठी करावा. पालकांनी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याची जिद्द, ऊर्मी पाल्यात आहे का, हे तपासून पाहावे. नियोजनबद्ध अभ्यास आणि मूलभूत संकल्पनांसह परीक्षेच्या प्रश्‍नावलींचा सराव केल्यास आयआयटीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. दैनंदिन अभ्यास आणि परीक्षेसाठी स्वयंअध्ययनाला वेळ दिल्यास ‘जेईई’ परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही.’’
दरम्यान, या चर्चासत्राला पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. पालकांच्या प्रश्‍न आणि शंकांचे निरसन करण्यात आले. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com