उमेदवारांच्या मनसुब्यांवर पावसाचे ‘पाणी’

उमेदवारांच्या मनसुब्यांवर पावसाचे ‘पाणी’

उमेदवारांच्या मनसुब्यांवर पावसाचे ‘पाणी’
कर्जत मतदारसंघात मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह होता. त्यामुळे, मतदान हे ६० टक्क्यांच्यावर जाईल, असा अंदाज सर्वांना होता. मात्र, घाटाच्या खालच्या भागात कर्जत, खालापूर परिसरात दुपारी मोसमीपूर्व पाऊस कोसळला आणि त्याने उमेदवारांच्या मनसुब्यांवर पाणी फिरविले. मतदानासाठी बाहेर पडणारा मतदार सायंकाळी अडकून पडला. त्यामुळे, त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम दिसून आला. त्यामुळे, उमेदवारांची धाकधूक देखील वाढली आहे.
- दीपक पाटील, नेरळ
----------
मावळ लोकसभा मतदारसंघातील १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघ घाटाच्या खालच्या भागात येतो. या विधानसभा मतदारसंघात दोन तालुके आहेत. दोन्ही तालुक्यात कर्जत, माथेरान, खोपोली या नगरपालिका असून खालापूर नगरपंचायत, नेरळ ग्रामपंचायत अस्तित्वात आहेत. खालापूर पट्ट्यात शिवसेना शिंदे गटासह शेतकरी कामगार पक्षाची बऱ्यापैकी ताकद आहे. तर खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटाची ताकद आहे. कर्जत तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राबल्य आहे. तर शेकाप येथे निर्णायक आहे.
सध्या कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. कर्जत हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, २००९, २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाल्याने येथील राजकीय चित्र बदलले होते. कर्जत तालुक्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समान ताकद आहे. मात्र, भाजपने देखील येथे आपले पाय रोवले आहेत.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सलग दोनदा मावळ लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले असून तिसऱ्यांदा निवडून येत ‘हॅटट्रिक’ करण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे घाटाखालील भागात नवखे आहेत. आपल्या कार्यकाळातील जनसंपर्क, विकासकामे ही बारणे यांची जमेची बाजू आहे. परंतु, जमिनीवर असलेला व्यक्ती, सर्वांचे म्हणणे सहज ऐकून घेणे, मितभाषीपणा यासह पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती यामुळे वाघेरे यांनी मतदारांत छाप पाडली आहे.
श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षांपासून संसदेत नेतृत्व करत आहेत. मात्र, मतदारसंघातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. कर्जत-पनवेल लोकल, कर्जत येथील कोरोनाकाळात बंद झालेले रेल्वे थांबे पूर्ववत झाले नाहीत, केंद्र सरकारची कर्जतमध्ये फसलेली हर घर नल योजना, पक्षातील कार्यकर्त्यांना वेळ न देणे आदींमुळे बारणे यांच्याबाबतीत नाराजीचा सूर आवळला जात आहे. त्यामुळे, त्याचा फटका त्यांना किती बसेल हे पहावे लागेल.
मतदानाच्या दिवशी कर्जत विधानसभा मतदारसंघात दिवसभर शहरांसह ग्रामीण भागांतून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रानंतर उत्साहात सुरु झालेले मतदान दुपारपर्यंत अगदी सुरळीत सुरु होते. मात्र, साधारणतः साडेतीन वाजता पावसाने हजेरी लावल्याने मतदानाचा टक्का घसरण्यासाठी कारणीभूत ठरला. दुपारी ४ ते ५.३० वाजेपर्यंत कर्जतमध्ये गारांसह पाऊस पडल्याने मतदार घरात अडकून पडला. ग्रामीण भागांत वादळी वारा, पावसाने वीजेचे खांब पडले. घरांवरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे, सुमारे २ ते ३ तास मतदार मतदान करु शकले नाही. शेवटच्या क्षणी आपला हक्काचा मतदार बाहेर काढणे बारणे यांना शक्य झाले नाही. हे लक्षात घेऊन कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करून त्या भागांत फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी बारणे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. त्यावर, निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे देखील पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com