परीक्षेत अव्वल येण्याचा अट्टहास घातक

परीक्षेत अव्वल येण्याचा अट्टहास घातक

पिंपरी, ता. १६ ः पालकांकडून अभ्यासाचा दबाव, स्पर्धेत सतत अव्वल राहण्याचा अट्टहास यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. त्यातच दहावी, बारावीची परीक्षा असेल; तर त्याकडे अधिकच गंभीरपणे पाहिले जाते. त्यामुळे, विद्यार्थ्यांमधील नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, परीक्षा, निकाल आणि स्पर्धा यांच्याकडे खेळाडू वृत्तीने पहा, असा सल्ला विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निकालावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनातील भविष्य अवलंबून असते. विशेषतः दहावी, बारावीत अनेकदा हुशार मुलांकडून पालकांच्या खूप अपेक्षा असतात. या अपेक्षा केव्हा अट्टहासाचे स्वरूप घेतात हे पालक व विद्यार्थ्यांनाही समजत नाही. या परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा दोन, चार टक्के जरी कमी पडले तरी मुले निराश होतात, असे होऊ नये म्हणून कोणत्याही परीक्षेकडे खेळाडू वृत्तीने पाहायला हवे.

विद्यार्थी, पालकात सुसंवाद हवा
अनेकदा परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांची लढाई नसून ती पालकांचीही झालेली दिसते. सध्याची पालकांची पिढी ही ‘मिलेनिअल जनरेशन’मधून येते. सुरवातीला मध्यमवर्गातून आलेल्या पिढीतील आई-वडील दोघेही नोकरी करणारे, मुलांचा सर्व गरजा पुरविणारे असतात. साहजिकच खूप कष्टांनी वर आल्याने त्यांच्या आपल्या मुलांकडूनही तशाच अपेक्षा असतात. अनेकदा मुलांचे गुण म्हणजे एक ‘स्टेट्स सिम्बॉल’ समजले जातात. साहजिकच मुलांना कमी गुण मिळाल्याचा धक्का पालकांनाही बसतो. अशावेळी मुलांना आपल्या प्रामाणिक भावना योग्य शब्दांत सांगणे, त्यांच्याशी योग्य संवाद साधणे गरजेचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला
अपयशामुळे विद्यार्थ्यांमध्ये येणाऱ्या नैराश्‍याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा याकडे पालकांकडून दुर्लक्ष केले जाते. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे किंवा उपचार घेणे हे कमीपणाचे वाटते. त्यामुळे, नैराश्‍याच्या सुरवातीच्या काळातच उपचार मिळत नाहीत. मात्र, जेव्हा अगदी त्याचे टोकाचे परिणाम पाल्यावर व्हायला लागतात. तेव्हा, पालक मुलांना घेऊन डॉक्टरकडे येतात. मात्र, योग्य वेळेत मानसोपचार तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनातूनही विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन मिळू शकतो.

नैराश्‍याच्या सुरवातीची लक्षणे
- चिडचिडेपणा वाढणे
- एकाकी राहणे व उदास असणे
- मोबाईलचा अति वापर करणे
- झोप न लागणे
- व्यसनांच्या आहारी जाणे

बचावासाठी काय करावे
- परीक्षेकडे खेळाडू वृत्तीने पहावे
- विद्यार्थी, पालक संवाद वाढवावा
- गुणांचा आग्रह ठेवावा, अट्टहास नको
- मिळालेल्‍या गुणांचा स्वीकार करावा

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य येण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, कमी गुण पडल्यामुळे येणाऱ्या नैराश्‍यात गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. अनेकदा या प्रकरणांमध्ये मुलांशी बोलून मानसिक आधार दिला तरी ते नैराश्‍यातून बाहेर येतात. काही मुलांना समुपदेशन द्यावे लागते. अगदी दहा टक्के विद्यार्थ्यांना नैराश्‍यातून बाहेर येण्यासाठी औषधोपचार करण्याची वेळ येते. परीक्षा व निकाल हे केवळ जीवनाच्या पुस्तकातील एक पान आहे. आयुष्य खूप मोठे आहे हे लक्षात घ्यावे.
- डॉ. जयदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com