

पिंपरी, ता. ९ : सध्या महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला आहे. जातीयवाद पसरविला जात आहे. सोशल मीडियातून तरुणांची माथी जाणूनबुजून भडकवली जात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
‘मनसे’चा १९ वा वर्धापन दिन मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केला होता. या वेळी ठाकरे बोलत होते.
या वेळी डॉ. सदानंद मोरे, मनसेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, किशोर शिंदे, बाबू वागसकर, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन चिखले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
‘महाराष्ट्र ः काल, आज आणि उद्या’ या विषयावर बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘‘प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक नाशिकमध्ये झाला. महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठे होते. ते भारतात अग्रेसर आहेत. मवाळ, जहाल आणि क्रांतिकारी गटाचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. महाराष्ट्रातील जातीयवादामुळे लोकमान्य टिळक यांच्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांकडे देशपातळीवरील नेतृत्व टिकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सर्व लोकांना सोबत घेऊन स्वराज्य घडविले. जातीचे ऐक्य गेले की राज्य नष्ट होते.’’ अनिल शिदोरे, शहर प्रमुख सचिन चिखले यांनी मनोगत व्यक्त केले.
राज ठाकरे म्हणाले -
- गुढीपाडवा मेळाव्यात दांडपट्टा फिरवणार आहे. आता शाब्दिक चाकू, सुरे घेऊन फिरणार नाही.
- विजय आणि पराभवाचे चढ- उतार येऊनही ‘मनसे’तील पदाधिकारी एकत्र कसे याचा अनेकांना प्रश्न.
- डोळा मारला की पक्ष बदल करणाऱ्या राजकीय फेरीवाल्यांना पक्षात स्थान नाही. आपण स्वतःच खणखणीत दुकान मांडू.
- पुढच्या दोन दिवसात पक्ष रचना निश्चित करणार. प्रत्येकाची कामे ठरवलेली आहेत.
- प्रत्येकाच्या कामाचा आढावा १५ दिवसात घेणार. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही.
- पक्षाची रचना उघड करणार नाही. मात्र, त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसेल.
राजमाता जिजाऊंच्या नावाने
महिला दिन ओळखला जावा
महिला दिनाच्या शुभेच्छा देताना राजमाता जिजाऊ यांच्या नावाने हा दिवस ओळखला पाहिजे. स्वराज्यासाठी मुलाकडून स्वराज्य घडवून आणण्याचे काम त्यांनी केले. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा अनेकांना विसर पडलेला आहे. सर्वात पुढारलेल्या महिला महाराष्ट्रात मिळतील, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
देशात नद्यांचे प्रदूषण
‘‘अनेक जण कुंभमेळ्याला जाऊन स्नान करून आले. एवढे पाप कशाला करता, असे मी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारले. सध्या नदी प्रदूषित केली जात आहे. श्रद्धा असावी पण डोळस असावी. देशात एक नदी स्वच्छ नाही. नदीला माता म्हणतात आणि तिला अस्वच्छ करतात, असे ठाकरे म्हणाले.
फोटोः 96442, 96444, 96447
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.