उद्योगनगरीतील पाण्याचे ऑडिट करा

उद्योगनगरीतील पाण्याचे ऑडिट करा

Published on

पिंपरी, ता. १२ ः कृषी सिंचनाला धक्का न लावता पुणे, पिंपरी-चिंचवडला पाणी आरक्षित करण्यास हरकत नाही. मात्र, यासोबतच पाणी पुनर्वापर किती होतो? लोकसंख्यानुसार पाण्याचा वापर किती आहे? पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी मीटर बसवता येतील का? याबाबत विचार करावा. तसेच, चीफ वॉटर ऑडिटरच्या माध्यमातून ‘वॉटर ऑडिट’ करावे. डाटा व्हेरिफाय करावा. धरणाचा गाळ व इतर मेंटनन्सची कामे मार्गी लावावीत, असा आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. दरम्यान, मुळशी धरणातून शहराला पाणी मिळावे, अशी मागणी होत आहे.
मुळशी धरणातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह मुळशी तालुक्यातील गावांना पाणी मिळावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर या धरणातून पाणी घेण्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुळशी धरण ब्रिटिशकालीन आहे. त्यातील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. धरणाची क्षमता १८.५० टीएमसी आहे. त्यातून पुणे, पिंपरी-चिंचवडला पाणी मिळावे, यासाठी यापूर्वी बैठकी झाल्या आहेत. दोन्ही शहरांसाठी प्रत्येकी पाच टीएमसी पाणी कोटा मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची चार मार्च रोजी भेट घेतली होती. तसेच, मुळशी धरणातून पाणी आरक्षण निश्चित करताना पुण्यासोबत पिंपरी-चिंचवडच्या प्रस्तावाचाही सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केली होती. यावर, संबंधित विभागाची उच्चाधिकार बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन विखे-पाटील यांनी दिले होते. त्यानुसार बैठक झाली. त्याला आमदार लांडगे यांच्यासह आमदार शंकर जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बैठक झाली. त्यात मुळशी धरणातून पाणी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २०२५-३० च्या दरम्यान ३५ लाखांच्या घरात असेल. पवना, आंद्रा, भामा-आसखेड सोबतच नवीन जलस्रोत निर्मिती ही शहराची गरज आहे. त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

मुळशी धरण टाटाने शासनामार्फत ९९ वर्षाच्या करारावर घेतले आहे. २०३१ पर्यंत करार संपुष्टात येत असल्याचे समजते. या धरणातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे जवळपास १७ टीएमसी पाणी हे सावित्री नदीमार्गे समुद्रात जाऊन मिळत आहे. या पाण्याचा व धरणसाठ्यातील ५ ते ७ टीएमसी पाणी शहराच्या उपयोगात आणावे.
- संदीप वाघेरे, माजी नगरसेवक, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com