पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची साद, उद्योगनगरीचा प्रतिसाद

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची साद, उद्योगनगरीचा प्रतिसाद

Published on

पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘पुनरावर्तन’ उपक्रमाला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याला उद्योगनगरीतील भाविकांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरात यावर्षी शाडू मातीच्या १४ हजार आठ गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. या मूर्ती विसर्जनानंतरची शाडू माती पुन्हा वापरता येणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा विशेष पुढाकार घेतला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या गणेश मूर्तींची पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मूर्तींच्या संकलनासाठी महापालिकेने ‘पुनरावर्तन’ उपक्रम राबवला. नागरिकांना शाडू मातीच्या मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यानंतर रासायनिक रंग मिसळल्यामुळे पाणी दूषित होते. त्याचा जलसृष्टीवर परिणाम होतो आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही संकट निर्माण होते. अशा वेळी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर हा पर्यावरणपूरक ठरला आहे. महापालिकेचा हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, घरामध्ये बादली किंवा टाकीतील पाण्यातही शाडू मूर्ती विसर्जित करता येते. त्यामुळे घरगुती विसर्जन सोपे होते आणि नद्यांवरील भारही कमी होतो. भविष्यात या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा महापालिकेचा मानस आहे, असे पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे फायदे
- पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित
- मातीमध्ये हानिकारक रसायन नसते
- विसर्जनानंतर मूर्ती सहज विरघळते
- पुन्हा मातीचा योग्य वापर शक्य
- बादली किंवा कृत्रिम हौदात विसर्जन
- घरगुती विसर्जनाला प्रोत्साहन

जलप्रदूषणाचे दुष्परिणाम
रासायनिक रंग व पॅरिस प्लास्टरच्या मूर्ती नदीत विसर्जित झाल्यास पाणी दूषित होते. या रसायनांमुळे ऑक्सिजनचे प्रमाण घटते आणि जलचर व वनस्पतींचे जीवन धोक्यात येते. हे पाणी शेतीसाठी वापरल्यास मातीची सुपीकता कमी होते. त्वचेचे आजार, पोटाचे विकार यांसारख्या समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ या प्रदूषणाचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो. त्यामुळे नद्यांचे संरक्षण करणे ही अत्यावश्यक गरज आहे, अशी माहिती पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदसिंह बन्सल यांनी सांगितली.

नद्यांचे प्रदूषण रोखणे, मातीचा पुनर्वापर करणे आणि सांस्कृतिक परंपरा जपणे, ही तिन्ही उद्दिष्टे शाडू मातीच्या मूर्तींपासून साध्य होतात. अशा उपक्रमांच्या माध्यातून आपण सर्वांनी आपली श्रद्धा जपत निसर्गाचे रक्षण केले पाहिजे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com