दोन दशकांत करावे लागणार ‘पाणी पाणी’
प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ : सध्या जलकोंडीचा तिढा सोडविण्यात व्यग्र असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना दोन दशकांत पाणी पाणी करावे लागण्याचा इशारा दिला आहे.
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दशकांतील पाण्याच्या अपेक्षित मागणीचा सविस्तर अभ्यास करून ‘पीएमआरडीए’ने राज्य शासनाला एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार ‘पीएमआर’ (पुणे मेट्रोपॉलिटन रिजन) क्षेत्रातील पाण्याची सध्याची मागणी १४२ टीएमसी आहे. २०५१ पर्यंत ती ३४५ टीएमसीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यात पिण्याच्या पाण्यासाठी फक्त ३५ टीएमसी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. योग्य उपाययोजना झाल्या नाही तर सद्यःस्थितीत चार टीएमसी, तर २०५१ मध्ये २८ टीएमसी पाण्याची कमतरता भासण्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
‘पीएमआर’ क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. नागरिकांची भविष्यातील संख्याही मोठी असेल. शहरीकरण वाढत असताना पाणी पुरवठा करताना संबंधित व्यवस्थेवर ताण येत आहे. पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असंख्य खासगी सोसायट्यांना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहणे भाग पडत आहे. भविष्याचा विचार करता योग्य उपाययोजना न केल्यास पाणी संकट आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ प्रशासन आधीच सतर्क झाले आहे. ‘पीएमआरडीए’कडे सध्या पाणी पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. तरीही आपल्या हद्दीतील एकूण पाणी पुरवठा आणि कमतरता यावर सविस्तर अहवाल बनवून तो राज्य शासनाला देण्यात आला आहे. यामध्ये उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. २०२४ मध्येच पीएमआरडीए क्षेत्रासाठी ३.१८ टीएमसी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता होती. २०५१ पर्यंत ही कमतरता २७.९८ टीएमसीवर पोहोचेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
--
तातडीच्या उपाययोजना
- औद्योगिक क्षेत्रासाठी तीन टीएमसी पाण्याचा पुनर्वापर सक्तीचा करणे
- बांधकामे, उद्यानांनासाठी नऊ टीएमसी पाण्याचा पुनर्वापर करणे
- जलनलिकांची गळती टाळून महसूल नसलेल्या पाण्यात सहा टीएमसी बचत करणे
- खडकवासला धरणातून बंद नळांद्वारे दोन टीएमसी पाणी पुरवठा करणे
- यातून एकूण २० टीएमसी पाण्याची बचत अपेक्षित
---
दीर्घकालीन उपाययोजना
- मुळशी धरणाची उंची वाढविणे
- नवीन बंधारे व धरणांची उभारणी करणे
- ‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या गरजेनुसार २१.८ पैकी १७.४ टीएमसी पाण्याचा बिगरघरगुती कारणांसाठी पुनर्वापर करणे
---
‘पीएमआरडीए’ क्षेत्रातील पाणी वाटप
- पिण्यासाठी - ३५
- औद्योगिक वापर - ४
- कृषी वापर - ११६
- अन्य वापर - २३
(आकडे टीएमसीमध्ये)
---
लोकसंख्या वाढीबरोबरच शहरांचा विकास वेगाने होत आहे. वाढत्या शहरीकरणात मूलभूत सुविधांचा विचार करणे सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून आवश्यक आहे. त्यापैकी पाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरीकरण वाढल्यानंतर नागरिकांना पाण्याचा पुरेसा पुरवठा करणे आवश्यक आहे. त्याचा अहवाल शासनाला दिला आहे.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.