तिहेरी संकटात सापडले ‘आयटीयन्स’ पावसाळ्यातही कार्यालयातून काम, पगार कपातीचीही टांगती तलवार
पिंपरी, ता. २४ ःसध्या हिंजवडीत होणारी वाहतूक कोंडी पाहता येथील कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा मिळावी, ही मागणी ‘आयटीयन्स’ सातत्याने करत आहेत. मात्र, बहुतांश कंपन्यांनी पाच दिवस कार्यालयात येणे बंधनकारक केले असून, काही कंपन्यांनी ‘हायब्रीड’चा पर्याय दिला आहे. त्यामुळे ‘आयटीयन्स’ला किमान दोन दिवस तरी कार्यालयात जाणे भाग पडत आहे. त्यामुळे कामाचा ताण, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ अशा तिहेरी संकटात आयटीयन्स अडकले आहेत.
पावसाळ्यात द्या ‘वर्क फ्रॉम होम’
खराब रस्ते, पावसात रस्त्यांवर साचणारे पाणी व वाहतुकीच्या योग्य नियमनाअभावी हिंजवडीतील वाहतूक व्यवस्था दरवर्षी पावसाळ्यात कोलमडून पडते. अशा वेळी येथे येणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. खड्ड्यांमुळे लहान मोठ्या अपघातांनाही सामोरे जावे लागते. गेल्या अनेक वर्षांमध्ये या समस्यांपासून सुटका होणे तर दूरच मात्र या समस्यांमध्ये भरच पडत आहे. हिंजवडीत असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक वर्षांपासून येथे येणाऱ्या लाखो आयटीयन्सला कार्यालयात येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. जास्त गाड्या रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे किमान पावसाळ्यात तरी ‘वर्क फ्रॉम होम’ द्यावे, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकार किंवा कंपनी व्यवस्थापन यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऑफिसला येणे अनिवार्य
कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा देण्यात आली होती. त्यावेळी सर्वच कर्मचारी आपल्या गावी जाऊन काम करत होते. मात्र, त्यानंतर ही सुविधा हिंजवडीतील मोठ्या नामवंत कंपन्यांनी बंद केली आहे. तर, काही कंपन्यांनी हायब्रीड म्हणजेच ३ दिवस घरून काम करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, दोन दिवस कंपनीत येऊन काम करणे हे अनिवार्य केले आहे. काही कंपन्यांमध्ये वर्षभरात ८५ टक्के उपस्थिती अनिवार्य केलेली असून यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘व्हेरिएबल पे’ ला मुकावे लागत आहे. मात्र, हिंजवडीत पावसाळ्यात पाणी साचून कोंडी होत असल्याने या काळात कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वर्षभर जरी कामासाठी कार्यालयात जावे लागत असले तरी किमान पावसाळ्यात ही सोय असावी, अशी मागणी होत आहे.
‘‘सध्या येथे सुरू असलेले मेट्रोचे काम व खराब रस्ते यामुळे कामानिमित्त येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने, कामाचे तास वेगवेगळे असल्याने, तसेच रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने सुरक्षिततेसाठी कर्मचारी स्वतःची चारचाकी घेऊन ऑफिसला जातात. त्यामुळे किमान पावसाळ्यात आयटी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ मिळावे ही आमची मागणी आहे.’
- पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.