उत्पादन तत्काळ थांबवण्याचे १२ कंपन्यांना आदेश
पिंपरी, ता. ३ : औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ कंपन्यांविरोधात कारवाई प्रस्तावित केली असून १२ कंपन्यांना उत्पादन तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तर पिंपरी चिंचवड महापालिकेनेही जलप्रदूषणास जबाबदार व्यक्तींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक वसाहतींमधून शहर परिसरात जलप्रदूषण व वायू प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘सकाळ’नेही ‘प्रदूषणाचे दूषण’ या वृत्त मालिकेद्वारे निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषणांकडे लक्ष वेधले. त्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्याअंतर्गत, उद्योग-कारखान्यांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली. या पथकांकडून अनेक उद्योग-कारखाने, कंपन्यांची अचानक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रदूषणाला जबाबदार असल्याचे निदर्शनास आल्यावर पथकांकडून संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. तर काही ठिकाणी उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
या पाहणी अनेक उद्योगांनी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे, परवानगीशिवाय उत्पादन करणे आणि मानकांपेक्षा जास्त प्रमाणात सांडपाणी सोडल्याचे आढळले. त्यामुळे मंडळाने २४ कंपन्यांविरोधात कारवाई प्रस्तावित केली असून १२ कंपन्यांना उत्पादन तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. एका कंपनीला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेकडून वाहने जप्त
पवना, इंद्रायणी नद्यांच्या पात्रात रासायनिक पाणी सोडल्याबद्दल महापालिकेने कंपन्यांना नोटिसा बजावल्या. तर नदीपात्रात भराव टाकण्यासाठी वापरलेली वाहने जप्त केली आहेत. औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरणीय जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देत मंडळाने सर्व उद्योगांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन
- उद्योगांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे
- नवीन तंत्रज्ञानाधारित प्रदूषण नियंत्रण साधने बसवावीत
- औद्योगिक परिसरातील प्रदूषणाची तक्रार नागरिकांनी नोंदवावी
एमआयडीसीकडून उद्योगांना जागा उपलब्ध करुन पायाभूत सुविधा दिल्या जातात. उद्योग सुरू करताना प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्याचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई केली जाते.
- अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, पुणे
निळ्या पूररेषेत भराव टाकून नदीपात्र अरुंद करण्याचे प्रकार वारंवार घडतात. पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकणाऱ्या व रासायनिक पाणी सोडणाऱ्या संबंधित व्यक्ती व संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भराव टाकण्यासाठी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली असून संबंधितांविरोधात पोलिसांत फौजदारी गुन्हे नोंदविले आहेत.
- हरविंदरसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांची वारंवार तपासणी केली जाते. पर्यावरणाचे नियम डावलणाऱ्या कंपन्यांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. तर काही कंपन्यांना उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटिसही बजावली जाते.
- मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

