मेट्रो बाणेरपर्यंत अंशतः धावणार नाही
पिंपरी, ता. २ ः आयटी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा बाणेरपर्यंतचा टप्पा अंशतः सुरू होणार नसल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हा टप्पा लवकरात लवकर सुरू करावा, असे पत्र ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने (एफआयटीई) सप्टेंबर महिन्यात दिले होते.
मेट्रो-३ ही मार्गिका ‘पीएमआरडीए’ विकसित करीत आहे. हे काम ९० टक्के झाले आहे. सध्याच्या स्थितीत उरलेले काम पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यासाठी रहिवासी व नागरिकांना किमान सहा महिने प्रतिक्षा करावी लागेल. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे बरेचसे कर्मचारी बाणेर-बालेवाडी परिसरात राहतात. या परिसरातही अनेक आयटी कंपन्यांनी कार्यालये काढली आहेत. त्या कंपन्यांमध्ये येणारे बहुतांश आयटी कर्मचारी हिंजवडी-वाकड परिसरात राहतात. त्यामुळे हा मार्ग खुला झाल्यास हिंजवडीतील कोंडी कमी होऊ शकेल. ‘एफआयटीई’च्या पत्रानंतर ‘पीएमआरडीए’ मेट्रो प्रशासनबरोबर बैठका घेतल्या. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावण्याची आयटीयन्सना आशा होती, मात्र ती मावळली आहे.
---
मेट्रोचा हिंजवडी-बाणेर टप्पा सुरू झाला असता तर हिंजवडी आयटी पार्क ते बाणेर आयटी पार्क अशी ‘कनेक्टिव्हिटी’ मिळाली असती. रस्त्यांची सध्याची स्थिती व वाहतूक कोंडी पाहता हा टप्पा सुरू करणे गरजेचे आहे. मेट्रो-३ प्रकल्पास बराच अवधी लागला आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होईल याचीही स्पष्टता नाही. दुसरीकडे शहरातील सर्व मेट्रो प्रकल्प टप्प्या टप्प्यानेच सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रकल्पही टप्प्यात सुरू केल्यास आयटीयन्स व रहिवाशांना फायदा होईल.
- पवनजीत माने, अध्यक्ष, ‘एफआयटीई’
---
रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही आयटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. वाहतूक व्यवस्था सुधारायची असेल मेट्रोशिवाय पर्याय नाही. आधीच या प्रकल्पाला बराच उशीर झाला आहे. त्यामुळे बाणेर-बालेवाडी, हिंजवडी-बाणेर टप्पा सुरू करण्याची आमची मागणी आहे. मी बालेवाडीतून हिंजवडी फेज २ला रोज प्रवास करतो. असे अनेक कर्मचारी आहेत. मेट्रो सुरू होण्यास विलंब लागत असल्याने सर्वांनाच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
- प्रथमेश क्षीरसागर, आयटी कर्मचारी, बालेवाडी
---
राधा चौक ते वाकड चौक दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आयटी कंपन्या, मोठी महाविद्यालये, रुग्णालये, शाळा आहेत. याशिवाय बाह्यवळण मार्गावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे या भागात प्रवासासाठी मेट्रो सोयीची आहे. येथील वाहतुकीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी हिंजवडी-बाणेर हा टप्पा सुरू करणे गरजेचे आहे.
- कपिल करकेले, आयटी कर्मचारी, म्हाळुंगे
---
मेट्रो-३ टप्प्या टप्प्याने सुरू करण्याबाबत आम्ही चर्चा केली होती. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांचीही बैठक झाली होती. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी तत्त्वावर (पीपीपी) असल्याने तो टप्प्याटप्प्याऐवजी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे आमचा कल आहे. हिंजवडी-बाणेर टप्पा सुरू करण्याबाबत सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाही.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, ‘पीएमआरडीए’
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

