आली दिवाळी, मिठाई घेताना घ्या काळजी !
पिंपरी, ता. १४ : दिवाळीमध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री टाळली जावी, यासाठी अन्न व औषध (एफडीआय) प्रशासनाने दुकाने आणि मिठाई विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांनीही पदार्थ खरेदी करताना तपासून घ्यावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
दिवाळीमध्ये मिठाई, गोडधोड पदार्थांना मोठी मागणी असते. त्यासाठी प्रामुख्याने तूप, तेल, दूध, गूळ, रवा, खवा आदींचा उपयोग विविध पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांना मागणी जास्त असल्यामुळे अनेक विक्रेते त्यामध्ये भेसळ करून विक्री करतात. मिठाईसह दुग्धजन्य पदार्थांमध्येही भेसळीचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यातून मानवी आरोग्याला अपाय होतो. त्यामुळे प्रशासनाकडून ही तपासणी केली जाते. संशयास्पद नमुने तपासणीसाठी पाठवून अहवाल आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाते.
काय करता येईल ?
- खाद्यपदार्थांच्या आवरणावरील ‘बेस्ट बिफोर’ तपासूनच खरेदी करा
- नेहमी प्रमाणित कंपनीचे व एफएसएसएआयचा लोगो असलेले पॅकबंद पदार्थ खरेदी करा
- उघड्यावर विकले जाणारे दूध, मावा, मिठाई, मसाले यांचा वापर टाळा
- अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्य पदार्थ घ्या
- खाद्यपदार्थ खरेदीचे बिल घ्या
- नाशवंत पदार्थांचा लवकरात लवकर वापर करा
- नाशवंत पदार्थ थंड ठिकाणी ठेवा
भेसळ कशी ओळखायची ?
रंग : नैसर्गिक पदार्थाचा रंग फिकट असतो. खूप चमकदार किंवा गडद हे कृत्रिम रंगाचे लक्षण असते.
गंध : पदार्थांना नेहमीपेक्षा वेगळा आणि तीव्र वास येतो.
अन्न सुरक्षा मोहिमेचे फलित काय ?
मनुष्यबळ चणचणीचा बाराही महिने ढोल वाजविणाऱ्या अन्न, औषध प्रशासनाकडून नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. वास्तविक, सध्या या प्रशासनाकडून ‘सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा’ ही राज्यभर मोहिम राबविली जात आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतपत कारवाई सोडल्या; तर या मोहिमेचे नेमके फलित काय? हा संशोधनाचा विषय आहे.
कुठे कराल तक्रार ?
अन्न पदार्थांमध्ये भेसळ किंवा अन्य संशय असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन ‘एफडीए’ प्रशासनाने केले आहे.
सणासुदीतच नव्हे तर बाराही महिने भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारात सर्रास विकले जातात. शहरात दाखल होणाऱ्या भेसळयुक्त अन्न पदार्थांचा संपूर्ण प्रकार प्रशासनाला ज्ञात आहे. मात्र, प्रत्येकवेळी प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई केली जाते.
- अरविंद देशपांडे, नागरिक, पिंपरी
भेसळयुक्त अन्न पदार्थांचे सेवन केल्याने, घसा खवखवणे, मळमळणे, पोटफुगी, अतिसार, उलट्या आदी स्वरुपाचे आजार उद्भवतात. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे. आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
- राहुल गायकवाड, सहायक प्राध्यापक, मेडिसीन विभाग, वायसीएम रुग्णालय
नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना ‘बेस्ट बिफोर’ अर्थात मुदत आणि पॅकिंग पाहूनच खरेदी करावी. बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त मिळणाऱ्या मालापासून सावध राहावे.
- पुष्पक जैन, विक्रेते, निगडी
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर धाडी टाकून भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.