रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सकारात्मक मुंबईत चर्चा केल्याची बाबा कांबळे यांची माहिती प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सकारात्मक
पिंपरी, ता. १० : रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो टॅक्सी ट्रान्स्पोर्ट फेडरेशन, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड या संघटनांच्या शिष्ठमंडळाने मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
ओला, उबेर, रॅपिडो यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी, कमी भाडे आणि जास्त कमिशनमुळे चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे, यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर धोरणे लागू करावीत, पुणे आरटीओ कमिटीने निश्चित केलेले नियम लागू करावेत, सीएनजी बाटली पासिंगचे दर कमी केले पाहिजेत, यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, तीन आसनी रिक्षांद्वारे होणारी बेकायदेशीर वाहतूक थांबवावी.
मुक्त रिक्षा परवाने बंद करून इलेक्ट्रिक वाहनांना परमीट प्रणालीत समाविष्ट करावे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा मागण्या बाबा कांबळे यांनी मांडल्या. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना करण्याचे आणि प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी उद्योगमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळिराम काकडे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रकाश यशवंते आदी उपस्थित होते.
-------