तीन महिन्यानंतरही त्रिवेणी चौकाला सिग्नल मिळेना 
अपघाताचा धोका ः महापालिका प्रशासनाला जाग केव्हा येणार?

तीन महिन्यानंतरही त्रिवेणी चौकाला सिग्नल मिळेना अपघाताचा धोका ः महापालिका प्रशासनाला जाग केव्हा येणार?

Published on

पिंपरी, ता. १३ ः निगडी-तळवडे मार्गावरील त्रिवेणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करण्यात आला. यालाही अडीच- तीन महिने झाले. मात्र, महापालिकेकडून अजूनही या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकात चारही दिशेने वाहने समोरासमोर येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे. रस्ता रुंदीकरण करून तीन महिने होऊनदेखील सिग्नल यंत्रणा बसविली नसल्यामुळे प्रशासन नक्की करतंय काय ?, सिग्नल यंत्रणा बसवून वाहतूक सुरळीत कधी होणार ? अपघातानंतर प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहनचालक विचारत आहेत.
निगडी-तळवडे हा मार्ग देहूगाव, चाकण आणि उपनगराला शहराशी जोडतो. तसेच चाकण-भोसरी या दोन्ही एमआयडीसीला जोडणार महत्त्वाचा मार्ग आहे. देहू, तळवडे या परिसरातून दररोज हजारो चाकरमानी कामानिमित्त शहरात येतात. तसेच चाकण-भोसरी या दोन्ही ‘एमआयडीसीं’ना जोडणारा मार्ग असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. शहरात येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आला आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने येथील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन महिन्यांपूर्वी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण केले. डांबरीकरणाचे काम देखील पूर्ण केले. त्यामुळे त्रिवेणी चौकाने मोकळा श्‍वास घेतला. मात्र आता या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहन चालक आडवी तिडवी वाहने चालवत आहेत. तळवडेकडून निगडीच्या दिशेने, भोसरीकडून भक्ती-शक्ती चौकाकडे आणि भक्ती-शक्ती चौकातून भोसरीकडे जाणारी वाहने समोरासमोर येत आहेत. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता रुंदीकरण केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. यामुळे वाहतूक प्रशासनाने येथे सिग्नल यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
----------
अपूर्ण कामामुळे वाहतूक वळवली
त्रिवेणी चौकातील रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. पण, चौकात सुशोभीकरणाची आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम बाकी आहे. काही ठिकाणी डागडुजीची कामे बाकी आहेत. त्यामुळे निगडीकडून तळवडेकडे जाणाऱ्या वाहन चालकांना सुमारे दोनशे ते अडीचशे मीटर पुढे जाऊन चिकण चौकातून यु-टर्न घेऊन माघारी यावे लागत आहे. निगडीकडून जाणारी सर्व वाहने चिकण चौकातून वळण घेत असल्यामुळे भक्ती-शक्ती चौकातून येणारी वाहनांचा वेग येथे मंदावतो. बहुतांश वेळा वाहतूक कोंडी देखील होते.
---
‘‘त्रिवेणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी सिग्नल नसल्यामुळे सर्व वाहने चौकात एकत्र येतात. त्यामुळे अवजड वाहने थेट अंगावर येण्याची भीती वाटते. अपघातही होण्याचा धोका आहे.
- मारुती शिंदे, वाहनचालक
-------
फोटो - ३१०६७/३१०६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com