पावसाळ्यानंतर पाडणार तीन धोकादायक पूल
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ः सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवाल सादर

पावसाळ्यानंतर पाडणार तीन धोकादायक पूल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ः सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवाल सादर

Published on

पुणे, ता. १६ ः जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध ठिकाणी असलेले तीन धोकादायक पूल हे पावसाळ्यानंतरच पाडले जाणार आहेत. यापैकी एका ठिकाणी पर्यायी पूल तयार करून, तो वापरात आला आहे तर दोन पर्यायी पुलांचे बांधकाम सुरू आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विभागांना धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक संबंधित विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पूल, साकव यांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालात तीन पूल धोकादायक असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे तिन्ही पूल पाडून टाकण्याचे आदेश विभागाला दिले होते. दरम्यान, अहवालानुसार जिल्हा परिषदेचे ५८ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडील तीन असे ६१ पूल धोकादायक असून, ते पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ‘पीडब्लूडी’च्या तीन पैकी एका पर्यायी पुलाचे जुलैअखेर पर्यंत काम पूर्ण होणार आहे. तर दुसऱ्या पुलासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. एका पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर म्हणाले, ‘‘इंद्रायणी नदीवरील देहूमधील पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यासाठी पर्यायी नव्याने बांधण्यात आलेला पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये नदीपात्रात पाणी अधिक असल्याने हा पूल पाडण्याचे नियोजन हे पावसाळ्यानंतर केले आहे. दुसरा पूल मरकळ येथील असून या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविले आहे. या पुलाला पर्यायी रस्ता असून आळंदी गावापुढील रस्त्याने नगर रस्त्याला जाता येते. या पुलाला पर्यायी पूल पुढील वर्षी मे महिन्यांपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतरच हा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात येईल. तिसरा पूल फुरसुंगी कदमवाक वस्तीला जोडणारा आहे. या पुलाला पर्यायी पूल जुलैअखेर तयार होणार असून, हा पूलही पावसाळ्यानंतरच पाडण्यात येणार आहे.’’

हे पूल पाडले जाणार...
१) इंद्रायणीनदीवरील देहू गावातील पूल
२) मरकळ गावातील पूल
३) फुरसुंगी कदमवाकवस्तीला जोडणारा पूल


‘‘विभागाकडील तीन पूल धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानंतर हे पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
- भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com