महानायकाचा जीवनपट उलगडणारी ‘भीमसृष्टी’
अश्विनी पवार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. महिला व कामगारांचे हक्क, उपेक्षित व दलित समाजासाठी उभारलेली चळवळ, सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा, शिक्षण, राजकारण, कायदा, अर्थशास्त्र आदी क्षेत्रांत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या जीवनकार्याचा प्रवास पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात साकारलेल्या भीमसृष्टीतील भित्तीचित्रांच्या (म्युरल्स) माध्यमातून मांडण्यात आला आहे.
उद्योगनगरीचे प्रेरणास्थान
मुंबई-पुणे महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकालगत (पिंपरी चौक) उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी उच्चांकी गर्दी होते. याच स्मारकाबाजूला महापालिका दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करते. येथील भीमसृष्टीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या जीवनाचा आढावा घेणारी २० भित्तिचित्रे लावली आहेत. प्रत्येक चित्रातून त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना जिवंत केल्या आहेत. शेजारील कोनशिलेवर संबंधित घटनेची माहिती दिली आहे. त्यामुळे हे स्मारक इथे येणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे.
‘सिग्नेचर दॅट चेंज्ड मिलियन्स ऑफ लाइफ’
पिंपरी-चिंचवड महापालिकेने भीमसृष्टी उभारली आहे. तिचे उद्घाटन २०१९ मध्ये झाले. प्रवेशद्वारावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी कोरण्यात आलेली आहे. ‘सिग्नेचर दॅट चेंज्ड मिलियन्स ऑफ लाइफ’ अर्थात ‘कोट्यवधी नागरिकांचे आयुष्य बदलणारी स्वाक्षरी’ अशा शब्दांत केलेला स्वाक्षरीचा गौरव हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग कार्याची प्रचिती देतो.
भित्तीचित्रांतून उलगडतो प्रवास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावात झाला. महू ते सातारा आणि त्यानंतर मुंबईतील एल्फिन्सटन हायस्कूलपर्यंचा त्यांचा प्रवास सुरुवातीच्या भित्तीचित्रांमध्ये दाखवलेला आहे. त्यांचे कुटुंबीय, परदेशातील शिक्षण, राजर्षि शाहू महाराज यांच्याशी भेट, माणगाव परिषदेतील सहभाग, छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार यांचाही उल्लेख आहे. स्वातंत्र्यापूर्वी गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग, त्यानंतर महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार, महाड येथे केलेला सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह या घटना तपशीलवार चित्रित केल्या आहेत.
‘भीमसृष्टी’ सर्वांसाठीच मार्गदर्शक
२९ ऑगस्ट १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली. त्यानंतर त्यांनी सलग दोन वर्षे ११ महिने १७ दिवस या कालावधीत भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर कायदामंत्री म्हणून शपथ घेतली. हे दोन प्रसंग अतिशय उत्तमरित्या येथे साकारण्यात आले आहेत. या भित्तीचित्रांच्या बाजूला लावलेल्या कोनशिलेतून डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व जीवनपट उलगडणारी ‘भीमसृष्टी’ सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

