भारताच्या एआय परिसंस्थेसाठी धोरण, संशोधन आणि स्टार्टअप्स आवश्यक
पुणे, ता. १० ः ‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि उद्योगरचना झपाट्याने बदलत असताना, देशाने प्रभावी धोरण, सखोल संशोधन आणि सक्षम स्टार्टअप्स यांचा मजबूत मेळ घालणे आवश्यक असून स्वत:ची स्वतंत्र, स्थानिक गरजांवर आधारित कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) परिसंस्था उभारणे गरजेचे आहे, असा सूर ‘पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल’मध्ये ‘स्टार्टअप्स, रिसर्च आणि पॉलिसी : बिल्डिंग इंडियाज एआय इकोसिस्टीम’ या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडला.
या परिसंवादात ‘मायक्रोसॉफ्ट’चे उपाध्यक्ष मयूर दातार, ‘भारतजेन’चे प्रमुख ऋषी बाल, ‘कॅलसॉफ्ट’चे कार्यकारी संचालक अंशुल भिडे आणि ‘टॉर. एआय’ या कंपनीचे संस्थापक निहाल कुलकर्णी यांनी देशातील ‘एआय’ क्षेत्राच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील दिशा, या वर विचार मांडले. चर्चेचे संचालन तंत्रज्ञान उद्योजक अमित परांजपे यांनी केले.
दातार यांनी सांगितले की, एआय हे बहुस्तरीय तंत्रज्ञान आहे. त्याच्या मुळाशी डेटा सेंटर्स, वीजपुरवठा आणि ‘नेटवर्किंग’ यांसारख्या पायाभूत सुविधा असतात. सध्या एआय चिप्ससाठी लागणारी वीज पूर्वीपेक्षा सुमारे दहा पट अधिक असल्याने ऊर्जा ही मोठी समस्या झाली आहे. देशाची डेटा सेंटर क्षमता सध्या १.२ ते १.५ गिगावॉट इतकी असून युरोप, चीन आणि अमेरिका या बाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. भारतीय भाषा, संस्कृती आणि सामाजिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्थानिक ‘एआय’ मॉडेल्स विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ऋषी बाल यांनी ‘एआय’ साठी स्वायत्तता, भारतीयत्व आणि दृष्टीकोन हे तीन महत्त्वाचे स्तंभ मांडले. देशी भाषा, संस्कृती आणि विचारपद्धती समजून घेणारी ‘एआय’ प्रणाली विकसित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भारतजेन’ ही स्वयंसेवी संस्था असून ती विद्यार्थी, संशोधक आणि विविध समुदायांना एकत्र आणून संपूर्ण ‘एआय’साठी परिसंस्था उभारण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भिडे यांनी देशातील स्टार्टअप्सच्या भूमिकेवर भर दिला. देशात ‘एआय’साठी मोठी बाजारपेठ असून देशांतर्गत भांडवल उपलब्ध आहे. मात्रन ‘एआय मॉडेल्स’साठी सरकारकडून निधी, वीज, डेटा आणि संशोधनासाठी अधिक सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
निहाल यांनी सांगितले की ‘एआय’मुळे भविष्यात मोठे सामाजिक आणि औद्योगिक बदल होणार आहेत. रोबोटिक्स आणि ‘एआय’मुळे नोकरी आणि उत्पादन क्षेत्रांतील कामांवर परिणाम होणार असून त्यात मोठे बदल दिसून येतील. त्यामुळे समाजाने मानसिकदृष्ट्या ‘एआय’ सोबत वाढण्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
चौकट
तज्ञ म्हणतात
पायाभूत सुविधा: डेटा सेंटर, वीज आणि नेटवर्किंग महत्त्वाचे
स्थानिक एआय मॉडेल्स: देशातील भाषा, संस्कृती आणि समाज समजणारे एआय गरजेचे.
स्टार्टअप्सची भूमिका: जागतिक दर्जाचे उत्पादन तयार करणारे स्टार्टअप्स; बाजार आणि भांडवल उपलब्ध.
आव्हाने: एआय तज्ज्ञांची कमतरता, संशोधन-उद्योगात दरी, एआय मॉडेल्समध्ये कमी गुंतवणूक.
भारताची ताकद: प्रचंड डेटा, सॉफ्टवेअर कौशल्य, मोठा देशांतर्गत बाजार, स्टार्टअप भांडवल.
PNE26V84104
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

