सायकल शर्यतीमुळे रस्त्याचे काम मार्गी

सायकल शर्यतीमुळे रस्त्याचे काम मार्गी

Published on

सोमाटणे, ता. ११ ः वनविभागाकडून संमती तसेच निधी मिळण्यात दिरंगाई झाल्यामुळे रस्त्याचे सुमारे साडेसात दशके रखडलेले काम अखेर आगामी आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीमुळे पूर्ण झाले. सायकल शर्यतीमुळे आमचे भाग्य उजळले, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. रस्ते चकाचक झाल्याने गावागावांत उत्साहाचे वातावरण आहे.
पवन मावळ पूर्व भागातील दळणवळणाची मुख्य वाहिनी असलेला चांदखेड-बेबडओहोळ मार्गे सोमाटणे हा रस्ता चंदनवाडी घाटातून वनविभागाच्या हद्दीतून जातो. वनविभागाची रुंदीकरणासाठी संमती नसल्याने या घाटात रस्त्याचे काम रखडले होते. हा रस्ता चंदनवाडी घाटामध्ये तीव्र उतार व वळणाचा असून अरुंदही आहे. त्यामुळे तेथे सतत अपघात होत होते. यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी चांदखेडचे नागरिक करीत होते, मात्र वनविभागाच्या संमतीअभावी काम रखडले होते.
प्रशासनाचा रुंदीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबीत होता. ढोणे ते शिवणे या रस्त्याचीही नियमित दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील खडी, डांबर उखडले होते. माती मुरम, खडीही रस्त्यावर पसरली होती. दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्ती व रुंदीकरणाची मागणी करूनही नागरिकांच्या पदरात निराशा पडत होती. पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर सायकल शर्यतीचा मार्ग पवन मावळातून जात असल्याने गेल्या दोन महिन्यांत सर्व परवानग्या मार्गी लागल्या. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रस्त्याचे रुंदीकरण करून आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार डांबरीकरणाचे काम पूर्ण केले. त्यामुळे हे रस्ते चकाचक झाले आहेत. आता स्पर्धेला दहा दिवस बाकी असून स्पर्धेच्या मार्गाशिवाय या मार्गाला जोडणाऱ्या इतर गावांच्या रस्त्यांचीही कामे पूर्ण झाली आहेत.
यामुळे निर्माण झालेल्या उत्साहात प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक गावात स्वच्छतेच्या मोहिमेने जोर धरला आहे. त्यामुळे गावेही चकाचक झाली आहेत. सर्वांना आता वीस जानेवारीच्या सकाळची प्रतिक्षा लागली आहे. परदेशी सायकलपटूंच्या स्वागतासाठी गावे सज्ज झाली आहेत. आता आमची गावे खेडेगाव राहणार नसून त्यांची वाटचाल शहराकडे होऊ लागल्याच्या गप्पा गावाच्या पारावर बसणाऱ्या ज्येष्ठांमध्ये रंगल्या आहेत.
---

आमच्या परिसरातील रस्त्यांची कामे सरकारी परवानग्यांच्या कचाट्यात सुमारे साडेसात दशके अडकली होती. अखेर सायकल शर्यतीमुळे रस्ते चकाचक झाले. हे काम उच्च दर्जाचे असल्याने ते अनेक वर्षे टिकणार आहे. या रस्त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांसाठी नवा रोजगार निर्माण होईल.
- मीना दत्तात्रेय माळी, सरपंच, चांदखेड
---
रस्त्यामुळे गावांचा विकास झाला आहे. आता गावांची वाटचाल शहरीकरणाकडे होणार आहे.
- सुवर्णाताई घोटकुले, सरपंच, आढले
---
आमच्या परिसरातील रस्त्यांचे जाळे उत्तम झाले आहे. त्यामुळे शेतीबरोबर तरुणांना व्यवसाय करण्याची चालना मिळणार आहे.
- उमेश आगळे, सरपंच, दारुंब्रे
------
फोटो
84365

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com