‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय’
पिंपरी, ता. ११ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे तीनच दिवस उरले आहेत. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ शिगेला पोहोचली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गल्लोगल्ली, घरोघरी तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये प्रचार करण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. मर्यादित वेळेत जास्तीत जास्त नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत आहे. थांबायचं नाय... गड्या थांबायचं नाय... अशा आवेशात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला गती दिली आहे.
वेळेची कमतरता लक्षात घेता अनेक उमेदवारांनी दिवसभर आणि रात्रीचा प्रचार सुरू केला आहे. मात्र, सध्या झोंबणारी थंडी प्रचारातील मोठा अडथळा ठरत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळेत थंडीची तीव्रता अधिक असल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवारांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यातच पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी काठच्या लोकवस्तीमधील प्रचार करताना अधिक थंडीचा सामना करावा लागत आहे. तरीही आता थांबायचं नाही, या भूमिकेतून प्रचार यंत्रणा अखंडपणे कार्यरत ठेवली आहे. सकाळच्या वेळेत नागरिकांची गर्दी प्रामुख्याने उद्याने, मैदाने आणि पदपथांवरच मर्यादित राहत असल्याने उमेदवारांना लोकवस्तीमध्ये थेट प्रचार करण्यास मर्यादा येत आहेत. अनेक नागरिक कामावर निघून गेलेले असतात, तर काहीजण थंडीमुळे घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे सकाळच्या प्रचारासाठी ठराविक ठिकाणांवरच भर द्यावा लागत आहे.
पिंपरी चिंचवड शहरासह उपनगरांमध्ये दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळेत मात्र घराघरांतील भेटी, लहान सभा, पदयात्रा, कोपरा सभा यांवर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वाडी-वस्ती गाठण्यासाठी कार्यकर्त्यांचे छोटे-छोटे गट तयार करून प्रचाराला वेग दिला जात आहे. काही ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र भेटी, तर युवकांसोबत संवाद साधण्यासाठी वेगळ्या बैठका घेतल्या जात आहेत.
प्रचारामुळे उमेदवारांची दमछाक
दिवस कमी असल्याने उमेदवारांची धावपळ अधिकच वाढली आहे. प्रचाराचे नियोजन, सभा, भेटीगाठी, मतदारांशी संवाद आणि कार्यकर्त्यांचा समन्वय या सगळ्यांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची अक्षरशः दमछाक होताना दिसत आहे. तरीही, मतदारांपर्यंत पोहोचण्याची एकही संधी दवडायची नाही, या निर्धाराने सर्वच उमेदवार प्रचाराच्या मैदानात उतरले असून, शेवटच्या तीन दिवसांत प्रचाराला वेगळीच धार येताना दिसत आहे. नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप वाढले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन प्रमुख नेते मैदानात उतरल्यामुळे प्रचारात रंगत आली असली तरी नेत्यांनी फारसे लक्ष न दिल्यामुळे काही प्रभागातील प्रमुख पक्षाचे उमेदवार नाराज असल्याचे चित्र आहे.
वेळ कमी, संघर्ष अधिक
उद्या कुठे भेटी द्यायच्या, कोणत्या वाड्या-वस्त्यांवर किती कार्यकर्ते पाठवायचे, अजून कोणत्या सोसायट्या राहिल्या आहेत, याची सतत गोळाबेरीज सुरू आहे. कॉलनी व बैठ्या घरांमध्ये कार्यकर्ते गेले आहेत का, याची खात्री करून उरलेल्या भागांसाठी नव्याने भेटीगाठीचे नियोजन करावे लागत आहे. काही सोसायट्या प्रचारास स्पष्ट नकार देत आहेत, तर काही ठिकाणी केवळ पाच ते दहा मिनिटांचा वेळ मिळतो. मात्र, अपेक्षित उपस्थिती न मिळाल्याने अनेक उमेदवारांचा आत्मविश्वास डळमळीत होत आहे. तरी, प्रचाराची लढाई अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच आहे. लढेंगे जितेंगे म्हणत बहुतांश पक्षाचे उमेदवार अख्खा पॅनेल निवडून आणण्याची हमी देत आहेत.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

