भगवद्गीता म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक पथ
पिंपरी,ता. २३ ः ‘‘भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ आहे,’’ असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने आयोजित हिंदू स्वाभिमान मेळाव्यात गायकर बोलत होते. चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला इस्कॅान मंदिरचे प्रमुख गोपती दास, किशोर चव्हाण, ॲड. सतीश गोरडे, नितीन वाटकर, माधवी सौंशी, परेश पटेल यांची मुख उपस्थिती होती.
गायकर पुढे म्हणाले, ‘‘अर्जुन नैराश्यात गेल्यावर भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून केलेला उपदेश हा मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गीताविरहित भारत ही कल्पनादेखील आपण करू शकत नाही. जोपर्यंत चंद्र - सूर्य अस्तित्वात आहेत. तोपर्यंत भगवद्गीता राहील. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह सर्व क्रांतिकारकांना लढण्याची प्रेरणा भगवद्गीतेने दिली.’’
जिल्हा मंत्री धनंजय गावडे यांनी स्वागत केले. संभाजी बालघरे, नवनाथ साकोरे, किरण शिंदे, तेजस्विनी डोमसे, मधुसूदन जैन, अरविंद लंघे, पन्नालाल जाधव, कौशल रावळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. परेश पटेल यांनी आभार मानले.

